Sunday, September 7, 2025

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे


ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे


संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि कालांतराने गाळ म्हणून काठावर सोडले जातात.  कोणत्याही संस्कृतीचा काठावर साचलेला गाळ तत्कालीन संस्कृती रक्षकांना सोयीचा वाटत असल्यामुळे ते नेहमी त्या गाळाचे समर्थन, संरक्षण करण्यामध्ये धन्यता मानत असतात.  संस्कृती ही नेहमी एका वास्तवाकडून पुढच्या वास्तवाकडे सरकत असते..  ती काही काळ स्थिर असते  आणि अनंतकाल वाहत असते.  जे तिच्या प्रवाहासोबत राहतात. त्यांना नव्या वास्तवाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते.    जे संस्कृतीचा जिवंतपणा संपवून तिला धर्म स्वरूप स्थिर करू पाहतात.  त्यांना वास्तवापेक्षा कपोलकल्पित विश्वात अर्थात इतिहासात रमायला आवडते.  


'संस्कृती ही पुरोगामी असते आणि धर्म हा परंपरावादी असतो' हा विचार अजूनही भारतीय मनामध्ये रुजलेला नाही.  पुरोगामी मानसिकतेला विरोध करून परंपरावादी आपला धर्म टिकाऊ पाहतात ‌. परंतु प्रत्येक काळात नव्याने निर्माण झालेल्या नव्या वास्तवातील घटकांना धर्माला सामावून घ्यावे लागते आणि अपरिहार्यपणे धर्म संस्कृतीच्या काही घटकांसोबत संस्कृतीच्या पुरोगामीत्वाला विरोध करतो.


चं प्र देशपांडे यांच्या ढोलताशे या नाटकामध्ये  परंपरा आणि नवता यांच्या सह-अस्तित्वाचा विषय चर्चेला घेतलेला आहे.  पुण्यातील लक्ष्मी रोडवर असलेल्या घरामध्ये राहणाऱ्या अक्षय शाळीग्राम हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी खिडकीतून दिसणारी गणपतीची मिरवणूक न पाहण्याचा निर्णय घेतो, खिडकीला कुलूप लावतो. परंतु मिरवणूक पाहायला आलेल्या काकूसमोर तो हतबल होतो आणि त्याला चावी द्यावी लागते.  बंद केलेली खिडकी उघडण्यापर्यंतच्या या नाटकातील कालावकाशात मिरवणूक का पाहायची नाही, हे समजावून सांगणारा अक्षय आणि धर्म, संस्कृती, परंपरा याचे संरक्षण करण्याबाबत त्याच्याशी वाद-विवाद करणारे समीर, घारापुरे, पारसनीस यांच्यातील संवाद म्हणजे हे नाटक आहे.

 


पुरोगामीत्व, नास्तिकता, धर्मनिरपेक्षतावाद याविषयी विस्तृत  चर्चा या नाटकात असल्यामुळे हे नाटक चर्चानाट्य ठरते.  हिंदुत्ववाद, मूर्तिपूजा, भावनांचे विरेचन अशा प्रकारच्या तात्विक निरूपणातून अक्षयला प्रतिवाद केला जातो, परंतु अक्षय सर्वांना पुरून उरतो. काकू सरते शेवटी राजहट्ट, स्त्रीहट्ट आणि वृद्धत्व हे बालपणच असते या नियमाने बालहट्ट यांच्या एकत्रित स्वरूपाच्या हुकूमशाहीने अक्षयकडून चावी मिळवते आणि खिडकी उघडून मिरवणूक पाहण्याची तिची इच्छा ती पूर्ण करते.  पुरोगामी आणि परंपरावादी या वादामध्ये वरवर पाहता परंपरावादी भूमिकेचा विजय दिसत असला तरी तो विचारांचा विजय नसून ही एक प्रकारची हुकूमशाही असल्याचे दिसून येते. 


ढोलताशे या नाटकाचा विषय सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, तात्विक अशा स्वरूपाचा आहे.  खिडकी बंद करून घेणारा, गणपतीची मिरवणूक कोणालाही पाहू न देणारा, स्वतःचे तत्त्वज्ञान इतरांना सक्तीचे करणारा अक्षय हासुद्धा हुकूमशहाच आहे.. आपल्या कुटुंबावर त्याने लादलेल्या निर्णयाची हुकूमशाही कौटुंबिक स्वास्थ बिघडवणारी आहे.  धर्म हा वैयक्तिक असायला हवा, पण तो जसा सार्वजनिक होतो तसा त्यामध्ये समाजातील सर्व घटकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक, नकारात्मक प्रतिक्रिया कालांतराने विकृत रूप धारण करतात असे मानणारा आणि तसे प्रतिपादन करणारा अक्षय आपल्या नातेवाईकांवर आपले विचार लादतो.  या दृष्टीने विचार करता अक्षयच्या हुकूमशाहीला काकूच्या हुकूमशाहीने शह दिला असे म्हणावे लागते. 


तात्विकदृष्ट्या अक्षयला कोणीही हरवू शकत नाही.  काकू खिडकी उघडून गणपतीची मिरवणूक पाहते तेव्हा तिच्यासोबत कोणीही मिरवणूक पाहायला उभे राहत नाही, सारे जण स्तब्धतेने अक्षयकडे पाहत राहतात.  अक्षयचे विचार पटलेले असले तरी ते निःस्तब्ध आहेत कारण ते विचारधारेच्या सीमारेषेवरचे आहेत.  त्यांना हिंदू धर्म परंपरेत नव्याने शिरलेल्या विकृत गोष्टी पटत नाहीत, परंतु त्याचबरोबर धर्म म्हणून या व्यवस्थेसमोर ते नतमस्तकसुद्धा आहेत.



दिवाणखाण्याच्या रंगमंचीय अवकाशामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाला या नाटकामध्ये विशेष स्थान आहे, विशेष महत्त्व आहे..  टेलिफोन बंद असणे. खिडकीतून गणपतीची मिरवणूक दिसणे,  साकेत या लहान मुलाच्या कपाळावर बांधलेली भगव्या रंगाची पट्टी, ढोलताशांचा आवाज, जिने चढून वर आल्याचा संदर्भ, शेजारी राहत असलेल्या बळवंतरावांच्या घरात टीव्हीला केबल नसणे, बळवंतरावांच्या घरात खिडकीसमोर असलेली गर्दी…पुढेपुढे सरकणारी ढोलताशांची मिरवणूक…. या प्रत्येक घटकामुळे नाटकाचा ताण वाढत राहतो. धर्म, तत्वचर्चेबरोबर या घटकांमुळे नाटकात पात्रांच्या महत्त्वपूर्ण हालचाली होतात.  ज्यामुळे रूढार्थाने जरी या नाटकाला कथानक नसले तरी उपकथनकांमधून नाटक परिपूर्ण होत जाते.


धर्म, संस्कृतीविषयक चर्चा करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे नाटकांमध्ये उपस्थित केलेले आहेत.  धर्मग्रंथात नसलेल्या परंतु रूढी, परंपरा, संस्कृतीमधून आलेल्या काही अनुचित असांस्कृतिक आणि सत्व गुणांचे नेतृत्व न करणाऱ्या गोष्टी कर्मकांडांमध्ये घुसलेल्या आहेत.  ज्या धर्मातून बाहेर काढण्याचे काम कोणीतरी करायला हवे..  धर्मकार्यामध्ये अपेक्षित असलेले मंगलवाद्य आज गणेश मिरवणुकीतून हद्दपार झालेले आहेत आणि ढोलताशे, नगारा, तुतारी यासारखी युद्धभूमीवरील वाद्य मिरवणुकीमध्ये वापरली जातात.  गुलालामुळे होणारे वायू प्रदूषण, आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आपल्या मंगलकार्यातून काढायला हवे.  या संदर्भात अक्षय स्वतःपुरता निर्णय घेत असला तरी “इतक्या सगळ्या लोकांना समंजस कसं करणार तू?” या अवंतीच्या प्रश्नावर अक्षय “ज्याचं त्यानं व्हायचं असतं…” असे उत्तर देतो.  त्याने त्याच्यापुरता हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला आहे परंतु गर्दीसमोर आपले विचार कसे मांडायचे याबद्दल त्याच्याकडे उपाय नाही.  


धर्म जेव्हा शक्तिप्रदर्शन करू लागतो तेव्हा तो करमणूक, उत्सव, नवस, मानसन्मान, नशा, गर्व या पातळीवर काम करू लागतो. यासंदर्भात अक्षय असे विधान करतो की,  “अहंकाराच्या समर्पणाला भक्ती म्हणतात…इथं तर अहंकाराचीच करमणूक आणि नशा चाललीय!” सणसमारंभ आणि विविध पूजा, अर्चना यामध्ये अपेक्षित असलेला आत्मिक आनंद जो खरे म्हणजे आतून यायला हवा तो आपण बाहेरून ओरबाडण्याचा प्रयत्न करतो आहोत…देवदर्शनापेक्षा ढोलताशा, मिरवणूक, देखावा, विद्युत रोषणाई यांचे दर्शन भक्ताला अपेक्षित आहे असे सध्या तरी दिसत आहे.  अक्षय या विचारांचा प्रसार करू इच्छितो परंतु त्याने जी घरापासून सुरुवात केली आहे तिथेच त्याला अपयश येते.  

        

        अक्षयच्या विचाराने प्रभावित झालेले  काका जोशी, अक्षयशी चर्चा करून त्याचे मतपरिवर्तन करून इच्छिणारे घारापुरे, अक्षय पुरोगामी आहे हे समजल्यावर त्याच्यापासून सावध राहायला हवे असे ठरविणारे अक्षयचे वरिष्ठ अधिकारी पारसनीस या पात्रांच्या माध्यमातून  प्रस्तुत नाटकांमध्ये विविध संज्ञा चर्चेला घेतलेले आहे 

  • मेंदू सांभाळा

  • टाॅपल डाऊन

  • वैचारिकपणाची गोची 

  • एकविध एकात्म होणे म्हणजे धर्म 

  • परंपरा आणि नवतेची बॅलन्सशीट 

  • नाही ऐसा मनी अनुभव- नथिंगनेस,

  • निद्रिस्त आणि जागृत देवस्थान 

  • सण समारंभातील बिझनेस 


या तात्विक मुद्द्यांपाशी प्रस्तुत नाटक वाचक प्रेक्षकांना आत्ममग्न करते. मनातील डावे आणि उजवे एकसंघ होऊ पाहतात.  नाटकाच्या शेवटापाशी जिंकलेली काकू, हरलेला अक्षय, स्तब्ध झालेली इतर पात्रे आणि आत्ममग्न झालेले वाचक/ प्रेक्षक अशी एक नवीन साखळी तयार झाल्याचे अनुभव घेता येतो.  मनामध्ये विचारांचे ढोलताशे संस्कृती-संक्रमण, परंपरा-नवता,  पूरोगामी-परंपरावादी या संकल्पनांची पुनर्मांडणी करू लागतात.



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
दिनांक २८ सप्टेंबर  २०२४ 

भाद्रपद कृष्ण ११ शके १९४६ 
इंदिरा एकदशी

Friday, April 4, 2025

प्रशासनिक पत्र

 

        प्रशासनात पत्र व्यवहाराला फार महत्वाचे स्थान असते.  सर्व प्रकारचा व्यवहार हा कागदपत्रांच्या माध्यमात सुरू असतो.  सध्या इमेल आणि सोशल मीडियाचा वापर संपर्क प्रभावी करण्याकरिता करत असले तरी, महत्वाच्या व्यवहाराला कागदावर प्रमाण ठरवले जाते.  आज जग पेपरलेस होण्याची गरज आहे.  कागदाचा वापर कमीत कमी करणे ही निसर्ग जतन करण्यासाठी आवश्यक बाब आहे.  असे असले तरी महत्वाचे दस्त कागदावर नमूद केले जातात.  महत्वाचे इमेलचे प्रिंट काढून फाइलमध्ये दस्त म्हणून सांभाळून ठेवण्याकडे सर्वाचा कल असतो.

        प्रशासनीक प्रत्र व्यवहार हा कार्यालयातील लिपिकासाठी नेहमीचा व्यवहार असतो.  कार्यालयात आलेल्या पत्रांना उत्तर देणे. कार्यालयाकडून विविध आस्थपनांना पत्रव्यवहार करणे.  हे नेहमीचे काम असते.  स्वाभाविकपणे पत्रव्यवहार हा आस्थापनाच्या लेटरहेडवर नमुद करणे आवश्यक असते.  तसेच या पत्रावर जावक क्रमांक आणि दिनांक आवश्यक असते.  पत्र व्यवहार कोणाला करायचा आहे त्या व्यक्तीचे नाव, हुददा, पत्ता, संपर्क क्रमांक यात नमुद करावा लागतो.  पत्रव्यवहाराचा विषय आणि संदर्भ ठळक अक्षरात लिहिल्यामुळे किंवा अधोरेखित केल्यामुळे पत्राचे वाचन करणाऱ्यास ते अधिक सोयीचे जाते.

        पत्राचा मसूदा नेमका आणि थोडक्यात लिहावा लागतो.  पत्र कोणाकोणाला पाठवायचे आहे ते प्रत रवाना या शीर्षकाखाली येते, तसेच पत्रासोबत जोडलेली कागदपत्रे सहपत्रात नमुद केलेली असतात.  काही महत्वाची नोद असेल तर तळटिप लिहिण्याचा प्रघात आहे. 


प्रश्नाचे स्वरूप


गृह संकुलातील सफाईचे काम करण्यासंदर्भात संबंधित निविदा काढण्यात आलेल्या होत्या, ज्या कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या त्या कंत्राटदारांना निविदा खुली करणे आणि त्यासंबंधी निर्णय घेणे या कामकाजाची दिनांक, वेळ आणि स्थळ याची माहिती देणारे पत्र तयार करा


उत्तरचे स्वरूप


लेटर हेड 


जावक क्रमांक                                                                   जावक दिनांक


प्रति 

अ.ब. क. को प्रा लि

पत्ता ----------------

----------------------- 

संपर्क क्रमांक


                विषय - निविदा खुल्या करण्याची दिनांक घोषित करण्याबाबत

                संदर्भ - आपला निविदा अर्ज - दिनांक / /

महोदय, 

        आम्ही या पत्राद्वारे आपणास असे सूचित करीत आहोत की, रविवार, दिनांक / / रोजी सकाळी १०.०० वाजता, संस्थेच्या कार्यालयात आम्ही निविदा खुली करीत आहोत. तरी उपरोक्त स्थळी वेळेआधी आपण उपस्थित राहावे. आपण अनुपस्थित राहिल्यास आपल्या निविदेचे वाचन करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

           कळावे, धन्यवाद.


                            कामकाजचे स्वरूप

                    सकाळी १०.०० वा. उपस्थिती ( चहा पाणी )

                    सकाळी १०.३०० वा. सभेला सुरुवात

                    सकाळी  १०.३० वा. निविदा खुली करणे

                    सकाळी ११.०० वा. निविदा वाचन

                    दुपारी  १२.०० वा. निविदेवर चर्चा

                    दुपारी १.०० वा. समारोप



                                                                        स्वाक्षरी



                                                     कोषाध्यक्ष  / सचिव / अध्यक्ष



प्रत रवाना

१     धर्मादाय आयुक्त, ठाणे




प्रा डॉ. आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक ५ एप्रिल २०२५ 

चैत्र शु ८ शके १९४७  

दुर्गाष्टमी


Thursday, April 3, 2025

टिप्पणी लेखन

 

        व्यवस्थापन कौशल्य समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयाची संपूर्ण माहिती असायला हवी.  विशेषतः कार्यालयात प्रत्येक विभागात कोणते काम चालते, त्या विभागाची व्याप्ती, मर्यादा, निर्णयक्षमता… याचा अभ्यास करावा लागतो. कार्यालयीन व्यवस्थापक कौशल्य असलेला लिपिक हा सर्व विभागाविषयी जाणकार असतो. अशाच कर्मचाऱ्यांना कार्यालयात महत्त्वाचे पद प्राप्त होते. विशेषतः त्याला कार्यालयीन कामकाजातील निर्णय निश्चित करणारे पद प्राप्त होते. 


        टिप्पणी लिहिणारा कार्यालयातील कर्मचारी हा कामकाजातील महत्त्वाचा दुवा असतो. कोणत्याही कार्यालयात येणाऱ्या विविध विषयाच्या फाईल्स आणि त्या फाइल्समध्ये असलेल्या प्रकरणांचा अभ्यास करून त्यावर घेतला जाणारा निर्णय, या संदर्भात कार्यालयाच्या प्रमुखाला मार्गदर्शन करणारा जो मुख्य लिपिक असतो, तो प्रत्येक फाईलचे अवलोकन करून त्यावर निर्णायक टिप्पणी लिहीत असतो.  आपल्या आस्थापनामध्ये असलेली फाईल पुढे कुठे जाणार आहे याची त्याला जाणीव असते आणि आपल्या आस्थापनाच्या निर्णयक्षमतेची मर्यादासुद्धा तो जाणून असतो. फाईलबद्दल नेमका कोणता निर्णय घ्यायला हवा याची सूचना तो वरिष्ठांना करतो. ती करीत असताना त्याला फाईलमध्ये नेमकी कोणती कागदपत्र आहे आणि कोणती कागदपत्र नाहीत याची नोंद करावी लागते. त्याचबरोबर त्याला फाईलमध्ये अपेक्षित असलेली कागदपत्रेसुद्धा माहीत असावी लागतात.

        टिप्पणी लेखकाने दिलेला निर्णय हा विशेषतः प्रस्ताव स्वीकारणे, नाकारणे, कागदपत्रांची पूर्तता अपेक्षित असणे, निर्णय राखून ठेवणे, सकारात्मक निर्णय देणे किंवा नकारात्मक निर्णय देणे किंवा पुनर्निर्णयासाठी फाईल परत पाठव… अशा सूचना टिप्पणी लेखक देत असतो





        टिप्पणी लेखनिकाला कार्यालयातील कक्षेचा जसा अभ्यास अपेक्षित असतो तसेच सर्व प्रकारच्या नियम, अटी यांचा अभ्यासही असावा लागतो. आपल्या कार्यासनासंदर्भात असलेल्या इतर कार्यासनाच्या कक्षेचाही अभ्यास करावा लागतो. एखादे प्रकरण जेव्हा फाईलच्या स्वरूपात त्याच्यासमोर येते तेव्हा अशा प्रकारची किती प्रकरणे प्रलंबित आहेत किंवा अशा प्रकारच्या पूर्वी आलेल्या प्रकरणांचा कोणता निर्णय घेण्यात आला होता, याची पूर्वपिठिका त्याला माहीत असावी लागते.

        फाईलमध्ये आलेले कागद हे खरे आहेत की खोटे याची सत्यता तपासण्याचे कौशल्य त्याच्यापाशी असावे लागते. वरिष्ठांना जेव्हा तो सूचना करतो, तेव्हा एका परिच्छेदात एकच मुद्दा अपेक्षित असतो, त्याचप्रकारे फाईलमध्ये असलेल्या गोपनीय अंकांचे तसेच आर्थिक संख्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी त्याचा उल्लेख टिप्पणीमध्ये करणे टाळावे लागते.


परीक्षेतील प्रश्नाचे स्वरूप 


श्री विजय शर्मा एका रुग्णालयात सफाई कर्मचारी असून त्यांना कामावर हजर असताना छोटासा अपघात झाला. त्यांना रुग्णालयाने प्रथमोपचार केले आणि विश्रांतीसाठी घरी पाठवले.  ते ज्या कंत्रातदारकडून करार तत्वावर काम करीत होते त्यांनी त्याला धमकावून कामावरून काढून टाकले आहे.  त्यांना नुकसान भरपाईसुद्धा दिलेली नाही.  या संदर्भात श्री विजय शर्मा यांनी पोलीस तक्रार केली होती.  रुग्णालय व्यवस्थापनास तक्रार केली होती.  त्यांनी असंघटित कामगार संघटणेकडे अर्ज सादर केलेला असून त्याच्या साठी कायदेशीर कामकाज सुरू करावे की करू नये या बाबत वारिष्टाना सूचना करणारी टिप्पणी मुख्य लिपिक या भूमिकेतून लिहा.   


उत्तरचे स्वरूप 


क्र १ कामगार संघटना 

दिनांक    /    /   


सादर 


श्री विजय शर्मा यांनी कामगार संघटनेला सादर केलेल्या पत्राचे अवलोकन करावे. 

श्री शर्मा यांना अपघात झाला होता, त्यांना रुग्णालयात उपचार दिले होते त्याचे 

कागदपत्र फाइलमध्ये आहेत. 

श्री शर्मा यांची अपघात झाला तेव्हाची रुग्णालयातील हजेरी दाखवणारे मस्टरची

झेरॉक्स प्रत फाइल मध्ये आहे. 

कंत्रातदारशी केलेल्या कराराची प्रत जोडलेली आहे. 

पोलीस तक्रार (एन सी ) प्रत जोडलेली आहे. 

रुग्णालयात दाखल केलेल्या तक्रारीची प्रत जोडलेली आहे. 


श्री शर्मा यांच्या अर्जाचा सकारात्मक विचार करण्यात यावा. 


लिपिक 

नाव  —----------------

दिनांक     /     /   




खातेप्रमुख 




प्रा डॉ. आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक ४ एप्रिल २०२५ 

चैत्र शु ७ शके १९४७  

एकवीरादेवी पालखी सोहळा - कार्ला


भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...