Wednesday, March 15, 2023

वृत्तलेख

            

            बातमी ही नित्यनेमाच्या जीवनरहाटीमध्ये फार महत्त्वाची असते.  कारण आपल्या जगण्याची किंवा आपल्या राहणीमानाशी संबंधित घटनांची किंवा घडणाऱ्या घटनांची आपल्याला माहिती मिळणे आवश्यक असते. योग्य वेळी योग्य माहिती मिळाली की आपल्या एकूणच निर्णयक्षमतेवर त्याचा परिणाम होत असतो.  यासाठीच वृत्तपत्र माध्यम हे बुद्धिजीवी वर्गाचे माहितीचे स्त्रोत म्हणून एक महत्त्वाचे माध्यम गणले जाते.  ज्यावेळी बातमी पोहोचविण्यासाठी कबुतरांसारख्या पक्षांचा किंवा दवंडी देणे, खलिता पाठविणे अशा प्रकारच्या संवाद माध्यमाचा वापर केला जात होता, तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे होते.  मुद्रीत माध्यमाचा शोध लागल्यानंतर विशेषतः इंग्रजी वृत्तपत्राचा परिचय झाल्यानंतर आपल्याकडे महत्त्वाची माध्यमक्रांती झाली.  वृत्तपत्र माध्यम हे महत्त्वाचे ठरले.  भारतीय विचारवंतांना व्यक्त होण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ सापडले.  तसेच लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीसुद्धा या माध्यमाचा उपयोग केला गेला. 


बातमी या शब्दाला इंग्रजी परिभाषा न्यूज अशी आहे याचा अर्थ नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, आणि साऊथ अशा चार दिशांवरून येणाऱ्या माहितीला बातमी असे म्हणतात.  एकूणच आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल जनहित लक्षात घेऊन किंवा कुतुहल म्हणून त्या घटनेला लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या माध्यमाला संप्रेक्षण  माध्यम म्हटले जाते आणि त्या घटनेच्या लिखित किंवा मौखिक स्वरूपाला बातमी असे म्हटले जाते.  वृत्तपत्र माध्यमातून लेखनाचा विचार करताना आपल्याला असे आढळून येते की वृत्तलेखनाचे प्रमुख तीन प्रकार दिसून येतात.  

  • बातमी 
  • अग्रलेख 
  • वृत्तलेख 


या मुख्य प्रकारांमध्ये उपसंपादक, मुख्य संपादक आणि निवासी किंवा सहसंपादक अशी महत्त्वाची पदे कार्यरत असतात.  वृत्तपत्राच्या कार्यालयीन आवाक्यानुसार किंवा त्याच्या वितरणानुसार या पदांची मांडणी होते.  छोटेखानी वृत्तपत्रांमध्ये बऱ्याचदा उपसंपादक, सहसंपादक आणि संपादक ही सर्व कामे एकाच व्यक्तीला करावी लागत असतात.  तर मोठ्या वृत्तसमूहाच्या कार्यालयामध्ये आपल्याला प्रत्येक विषयानुसार उपसंपादकांची रचना दिसून येते.  त्यामुळे बातमी अग्रलेख आणि वृत्तलेख यांचे विविध प्रकार मोठ्या वृत्तपत्रांमध्ये आपल्याला आढळून येतात. 


            घडलेली घटना लोकांपर्यंत पोहोचवीत असताना काय? कधी? कुठे? कसे? केव्हा? कोणी? अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून तयार केलेली लिखितसंहिता म्हणजे बातमी असते.  या बातमीमध्ये उपसंपादकाने स्वतःचे मत मांडायचे नसते तर घडलेल्या घटनेचा केवळ तपशील मांडायचा असतो. शुद्ध बातमी ही फक्त घडलेल्या घटनेशी प्रामाणिक असते. अग्रलेखांमध्ये मात्र संपादकाला स्वतःचे मत मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते.  त्यामुळे अग्रलेख लिहिणारा मुख्य संपादक किंवा विषयवार लेखन करणारा  संपादक त्याची प्रामाणिक मते नोंदवत असतो.  परंतु प्रत्येक वृत्तपत्राची स्वतःची काही राजकीय, सामाजिक, धार्मिक, वैचारिक धोरणे असतात.  तसेच वृत्तपत्राची स्वतःची शैलीपुस्तिका असते.  या मर्यादांचा विचार करत मुख्य संपादकाला अग्रलेख लिहायचा असतो.  पूर्वी हा अग्रलेख पहिल्या पृष्ठावर लिहिला जात असते म्हणूनच त्याला अग्रक्रमाचा मान होता.  परंतु कालांतराने बातमीचे महत्त्व वाढल्यामुळे आणि बातमीची संख्याही वाढल्यामुळे अग्रलेखाची जागा तिसऱ्या किंवा चौथ्या पृष्ठावर गेली.  अग्रलेखाचा विचार बऱ्याचदा राजकीय आणि सामाजिक पातळीवरती विचार प्रवर्तक म्हणून केला जातो.  

बातमी लिहिल्यानंतर बऱ्याचदा उपसंपादकाला बातमी व्यक्त झाल्यानंतर स्वतःची काही मते मांडावीशी वाटत असतात.  परंतु ती त्याला वृत्तपत्राच्या नियमानुसार बातमीमध्ये मांडता येत नाही.  त्यामुळे स्वाभाविकच अशा असलेल्या विचारांचा तत्त्वांचा साठा  उपसंपादकाच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो.  या साचलेपणाला व्यक्त करण्यासाठी वृत्तलेख  ही रचना कार्य करते. बातमीशी संबंधित मत मांडण्याचे स्वातंत्र्य वृत्तलेखक घेत  असतो.. त्यामुळे बातमी मागचे वास्तव किंवा बातमीशी संबंधित भविष्यातील सूचना वृत्तलेखकाला देता येतात..


मोठ्या वृत्तसमूहामध्ये स्वाभाविकपणे वाचकांच्या मागणीनुसार शनिवार आणि रविवारच्या पुरवणी मध्ये विविध प्रकारच्या विषयाशी संबंधित स्तंभलेखन, सदरलेखन आणि वाचकांच्या पत्र व्यवहाराला सामावून घेतलेले असते.  आठवड्यामध्ये असलेल्या विशिष्ट दिन महात्म्याला डोळयासमोर ठेवून किंवा एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्याशी संबंधित परिचयात्मक लेखनाला व्यक्त करण्यासाठी शनिवार-रविवारच्या पुरवणीमध्ये काही मान्यवर लेखकांना त्यांचे मत मांडण्यासाठी आमंत्रित केले जाते.  यामध्ये मांडली गेलेली मते संपादक स्वतःच्या सहमतीने जरी छापत असला तरी वृत्तपत्र कायद्याच्या नियमानुसार या सर्व लेखांमधील मताशी तो तात्विकदृष्ट्या सहमत असेलच असे नाही.. त्यामुळे या स्तंभ लेखनामध्ये किंवा सदर लेखनामध्ये मांडल्या गेलेल्या मतांच्या विरोधात जर एखाद्या व्यक्तीने पत्रव्यवहार केला तर त्या पत्राला प्रसिद्धी देण्याचे काम संपादकाला करावे लागते.  या दृष्टीने वाचकांच्या पत्रकाराला सुद्धा वृत्तपत्रांमध्ये महत्त्वाचे स्थान असते.


ज्याप्रकारे क्क्रिकेटच्या सामन्यामध्ये बॅटला लागून उडालेला प्रत्येक चेंडू हा झेल असतो परंतु तो झेल तयार करण्याची जबाबदारी ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंची असते.  तसेच आजूबाजूला घडलेल्या प्रत्येक घटनेला बातमीचा दर्जा असतो, परंतु त्या बातमीचे महत्त्व किंवा ही बातमी कोणासाठी महत्त्वाची आहे, याची निश्चिती करण्याची जबाबदारी पत्रकाराची असते.  या संदर्भात बातमीचा वास ही संकल्पना वृत्तपत्रविद्येशी संबंधित वापरली जाते. 


घडणाऱ्या सर्व घटना जरी बातमी असल्या तरी त्या सर्वच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करता येत नाहीत.  घटनेची बातमी होण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी वृत्त लेखकला  लक्षात घ्याव्या लागतात.  जी घटना आपण बातमी म्हणून नोंदवत आहोत, ती कोणत्या घटकाशी संबंधित आहे?  तिची तीव्रता किती आहे? आणि ती प्रसिद्ध केल्यामुळे नेमक्या कोणत्या घटकांवर तिचा परिणाम होणार आहे? याचा विचार करावा लागतो.  घटनेची परिणाम परिणामकारकता हा विषय पत्रकाराला समजून घ्यावा लागतो. आपला वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवून त्या वाचक वर्गाला अभिरुची संपन्न बनविणे तसेच त्याच्या ज्ञानात भर घालणे ही जबाबदारी पत्रकाराची असते.  त्यामुळे प्रेरणादायी किंवा माहिती, ज्ञान  देणारी अशी बातमी तयार करण्याची जबाबदारी वृत्तलेखकाची असते.  थोडक्यात एंटरटेनमेंट आणि इनलाईटमेन्ट म्हणजेच करमणूक आणि ज्ञानात्मकता या दोघांचा संयोग पत्रकाराला बातमी तयार करताना करावा लागतो. 


आपला वाचक नेमका कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराला वाचकांशी सुसंवाद साधावा लागतो आणि त्यानुसारच वाचकाच्या मागणीचा विचार करून बातमीचा पुरवठा करावा लागतो.  या दृष्टीने वाचकाची समीपता हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.  बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिचे महत्त्व, ताजेपणा आणि नाविन्य या निकषांचा विचार करावा लागतो.  कारण जुनी घटना बातमी म्हणून प्रसिद्ध केली तर वाचक दुखावण्याचा संभाव असतो.  तसेच वाचकाचे कुतूहल जागृत ठेवण्याची जबाबदारी वृत्तनिवेदकाने निभावली नाही तर वृत्तपत्राचा दर्जा खालवण्याची शक्यता असते.  त्यामुळे बातमी लेखन करताना समाजातील नेमका आपला वाचक वर्ग कुठल्या घटकांमध्ये येतो.  त्याचा आर्थिक स्थर,  बौद्धिक क्षमता आणि समाजभान याचे ज्ञान पत्रकाराला असावे लागते. 

वृत्तलेखन करीत असताना उलटा त्रिकोण ही संकल्पना महत्त्वाची ठरते.  कारण वृत्तपत्र जेव्हा प्रत्यक्ष संगणकावर तयार केले जाते तेव्हा पृष्ठांची रचना करताना अति महत्त्वाच्या, महत्त्वाच्या आणि गौण महत्त्वाच्या घटना याप्रमाणे लिहावे लागते.  पृष्ठ तयार करताना कधीकधी कारागिराला काही बातम्यांना कात्री लावावी लागते.  अशावेळी तो बातमीचा शेवटचा भाग कापतो.  म्हणूनच अतिमहत्त्वाचे संदर्भ बातमीच्या शेवटी देणे धोक्याचे असते.  या दृष्टीने बातमीचे पुढील घटक ठरतात.  

  • मथळा 

  • शिरोभाग 

  • तपशील 

  • विस्तार 


बातमीच्या मथळ्यामध्ये अर्थात शीर्षकांमध्ये बातमी विषयीचे वाचकाचे आकर्षण निर्माण केले जाते.  त्यामुळे बातमीच्या शीर्षकांमध्ये क्रियापदाचा वापर केला जात नाही.  वाचकाला बातमी वाचायला उद्युक्त करण्यासाठी अशा प्रकारची रचना केली जाते.  बातमीचा मथळा हे बातमीच्या संपूर्ण घटनेचे सारतत्व असते.  बातमीच्या शिरोभागामध्ये दिनांक, प्रतिनिधी, वृत्तसंस्था, वार यांचा उल्लेख करून संपूर्ण बातमीचा सारांश थोडक्यात मांडलेला असतो.  तर पुढच्या परिच्छेदामध्ये बातमीचा तपशील ज्यामध्ये घडलेल्या घटनेचे संपूर्ण वर्णन केलेले असते.  वर्णनाव्यतिरिक्त राहिलेल्या घटकांचा शेवटच्या परिच्छेदात समावेश केला जातो.  यामध्ये कमी महत्त्वाचा तपशील लिहिलेला असतो. 


बातमी तयार करणाऱ्या उपसंपादकांनी आपल्या वाचकाला डोळ्यासमोर ठेवून बातमीची रचना करायची असते.  आपल्या वाचकाला सहज सोप्या भाषेत बातमी समजायला हवी हा उद्देश वृत्तलेखकाचा असायला हवा.  तसेच ज्या शब्दांचा अर्थ वाचकाला समजणार नाही असे पाल्हाळीक  शब्द त्यांनी वापरणे टाळावे.  मोठ्या पल्लेदार वाक्यांची रचना न करता सुट्ट्या , छोट्या वाक्यरचना बातमीमध्ये असायला हव्यात.  मराठी भाषेत आपण महत्त्वाचे काम करीत आहोत, याची जाणीव वृत्तलेखकाला असायला हवी.  या दृष्टीने तो भाषाप्रभू असायला हवा.  भाषेत आलेल्या नव्या शब्दांची मांडणी त्यांनी करायला हवी आणि भाषा समृद्ध कशी होईल याचाही विचार त्याच्या लेखनातून व्हायला हवा.  देशद्रोहासारख्या मुद्द्याला वृत्तलेखकाने अभ्यासपूर्णपणे समजून घ्यायला हवे.  नैतिक अनैतिक या घटकांचा सुद्धा त्याच्या लेखनाशी संबंध असायला हवा.  आपल्या लेखनामुळे एखाद्या व्यक्तीला, स्त्रीला, बालकांना व्यवस्थेला, धर्माला आणि देशाला त्रास होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला हवी.  आपल्या लेखनातून कोणाच्याही बदनामीचा सूर असता कामा नये किंवा आपल्या लेखनामुळे दोन समाजामध्ये ताण निर्माण होता कामा नये याचीही काळजी वृत्तलेखकाने घेणे गरजेचे असते. 




संदर्भ  - 
https://www.educationalmarathi.com/2020/10/how-to-write-news.html 



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
१६  मार्च २०२३ 
फाल्गुन कृ ९  - शके १९४४ 




No comments:

Post a Comment

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...