गोष्ट ऐकणे ही एक सर्वसामान्य आस्वादकासाठी पर्वणी असते. वाचण्यापेक्षा ऐकण्याची अभिरुची एकूणच सर्व भाषा बोलणाऱ्या भाषिकांमध्ये आढळून येते. प्रत्यक्ष चित्रपट पाहण्याऐवजी चित्रपटाचे कथानक ऐकणे आणि त्या चित्रपटाविषयी जाणून घेणे ही सुद्धा एक अभिरुची आपल्याला आढळून येते. अर्थात कथा ऐकण्याची ही मानसिकता आजच्या काळातली नसून ही एकूणच प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कथा सांगणे आणि कथा ऐकणे याला धार्मिक अधिष्ठान सुद्धा प्राप्त आहे. निरनिराळ्या व्रतवैकल्याणमध्ये व्रतकथा सांगणे आणि त्याची श्रवणभक्ती करणे ही एक परंपरा म्हणून आजही टिकून राहिलेली दिसते. नभोवाणीचा जेव्हा उदय झाला तेव्हा माणसाच्या या अभिरुचीला टिकवून ठेवण्यासाठी किंबहुना कथा ऐकण्याची अभिरुची असलेल्या वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नभोवाणीवरून श्रुतिका सादर होऊ लागली. आठवड्यांतील काही दिवसांमध्ये ठराविक वेळेला श्रुतिका सादर केली जात होती आणि त्यासाठी आपले घरातील काम सांभाळून ऐकण्याची एक नवीन परंपरा निर्माण झाली. अशीच परंपरा कालांतराने दूरदर्शनच्या बाबतीतही निर्माण झाली होती. त्यावेळी नभोवाणी आणि दूरदर्शन यांच्या वेळापत्रकानुसार घरातील वेळापत्रकामध्ये बदल झालेला दिसतो. हा बदल वाचकाच्या आस्वादकाच्या अभिरुचीचा आणि आस्वाद घेण्याच्या आकर्षणाचा भाग होता.
आज सरकारी नभोवाणी वाहिन्यांसोबत निमसरकारी आणि वैयक्तिक नभोवाणी वाहिन्या सुरू झालेले आहेत. त्यामुळे आस्वादकाची मागणी ही दिवसेंदिवस वाढते आहे. या दृष्टीने नभोवणीवरून कथा सादर करणे आणि कथालेखन करणे याविषयीची शैली समजून घ्यावी लागते. श्रुतिका लेखन नभोवाणीची मागणी असून या मागणीनुसार अपेक्षित लेखन करणे लेखकाचे काम ठरते. त्यासाठी मुळात नभोवाणी आणि श्रुतिका यांचे नाते समजून घ्यावे लागते.
नभोवाणीवरून जेव्हा एखादी कथा सादर केली जाते, तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला केवळ ऐकू जाणार आहे. त्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर कथेतील पात्र, प्रसंग आणि कथेविषयीचे भाष्य डोळ्यासमोर उभे राहणे अपेक्षित असते. तसेच नभोवाणीचे आस्वादक केवळ नभोवाणी समोर बसून नसतात तर ते त्यांच्या वैयक्तिक कामकाजामध्ये मग्न असतात. त्यांची एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठीचे सुद्धा काम लेखकाला समजून घ्यावे लागते. आपण जे लेखन करणार आहोत त्यातून श्रुतिका सादरकर्त्या कलावंताला सोप्या पद्धतीने श्रुतिकेतील कथानक आस्वादकासमोर मांडता यायला हवे याचे भान श्रुतिका लेखन करणाऱ्या लेखकाला असावे लागते.
कथा जेव्हा लिहिली जाते तेव्हा लेखकाला कथेच्या काही महत्त्वपूर्ण घटकांचा विचार करावा लागत असतो. त्यामध्ये विषय, आशयसूत्र, अनुभवविश्व, कथानक, पात्र रचना, प्रसंगवर्णन, भाषाशैली, संवाद या काही प्राथमिक गोष्टी त्याच्या कथेचा महत्त्वाचा भाग बनत असतात. समीक्षक याच घटकांचे मूल्यमापन करीत लेखकाच्या लेखनकृतीचा समीक्षात्मक आढावा घेत असतात. श्रुतिका लेखन करीत असताना आपण श्रुत माध्यमांमध्ये काम करीत आहोत, याची जाणीव लेखकाला असावी लागते. त्यामुळे स्वाभाविकपणे कथेच्या या सर्व घटकांचा सादरीकरणाच्या दृष्टीने विचार करावा लागतो. आपण ज्या नभोवणी वाहिनीसाठी लेखन करणार आहोत, त्या वाहिनीच्या सामाजिक, वैचारिक, तात्विक भूमिकेचा अभ्यास करून आपल्या श्रुतिकेचे विषय निश्चित करावे लागतात. त्याच प्रकारे विषयाच्या मांडणीमध्ये अपेक्षित असलेले अनुभवविश्व आणि आशयसूत्र यांची सांगड घालत असताना श्रोत्याच्या मनामध्ये आपल्याला अपेक्षित असलेल्या अनुभवाचे रूप त्याच्या चिंतन प्रक्रियेमध्ये परावर्तित होण्यासाठी थेट भाष्य स्वरूपात विधाने करणे अयोग्य ठरते. संवादाच्या आणि वर्णनाच्या माध्यमातून भाष्य स्वरूप विधानाच्या मदतीने अनुभवविश्वाची मांडणी करावी लागते. या अनुषंगाने असे म्हटले जाते की श्रुतिका हे नभोनाट्याचे लघुरूप असते. पात्र आणि संवाद यांच्या तुलनात्मक जास्त वापर करावा लागत असल्यामुळे अशा प्रकाराची व्याख्या होणे स्वाभाविक आहे. परंतु ज्याप्रकारे आपण कथा आणि नाटक यांच्यामध्ये भेद करतो तसाच भेद येथे करणे अपेक्षित आहे.
दूरचित्रवाणी अर्थात टीव्ही या माध्यमांमध्ये जेव्हा आपण आस्वाद घेत असतो, तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष पात्राचे रूप, त्याच्या हालचाली, त्याचे हावभाव आणि त्याचा संवाद याचबरोबर त्याचा पेहराव आणि एकूणच त्याच्या दिसण्यातील सौंदर्य आपल्या डोळ्यांच्या वाटे आपल्या बुद्धीच्या पटलावर स्वाभाविकपणे निर्माण होते. परंतु हेच काम श्रुतिका लेखन करताना लेखकाला शब्दांच्या मांडणीतून करावे लागते. पात्राच्या हालचाली, त्याचे दिसणे तसेच त्याच्या स्वभावातील विविध कंगोरे लेखकाला पात्रवर्णनाच्या माध्यमातून साकार करावे लागतात. श्रुतिका ही केवळ लिखितसंहिता नसून ती सादरीकरण केल्यानंतरच परिपूर्ण होत असते. अर्थात श्रुतिका ही एक संमिश्र कला आहे. त्यामुळे जेवढी जबाबदारी लेखकाची असते, तेवढीच जबाबदारी श्रुतिका सादर करण्याची सुद्धा असते. एखाद्या पात्राचे चित्र आस्वादकाच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी लेखकाने लिहिलेल्या पात्र वर्णनाला तसेच संवादातील भाषेला आस्वादकापर्यंत नेमकेपणाने पोहोचवण्याचे काम श्रुतिका सादरकर्त्याचे असते. तसेच आपण असेही म्हणू शकतो की सादरकर्त्या कलावंताला सहज सोप्या पद्धतीने श्रुतिकेतील कथाशय वाचकापर्यंत आस्वादकापर्यंत पोहोचवण्याचे काम श्रुतिकालेखन करणाऱ्या लेखकाचे असते. ही एकास एक अशी प्रक्रिया असल्यामुळे कलाकृतीच्या यशमध्ये श्रुतिकालेखक सादरकर्ता, पार्श्वसंगीतकार या सगळ्यांचेच महत्त्व नोंदवावे लागते.
नभोवाणीवर जेव्हा एखादी कथा श्रुतीकेच्या रूपाने सादर केली जात असते, तेव्हा आस्वादकाच्या मागणीनुसार कथेची निवड केली जाते. किंबहुना काही मान्यवर कथाकारांच्या प्रसिद्ध असलेल्या कथा कादंबऱ्या यांची मागणी केल्यामुळे त्यांचे श्रुतिकेमध्ये रूपांतर करावे लागते. पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेली कथा जशीच्या तशी वाचणे ही सुद्धा मागणी असू शकते परंतु अशा प्रकारचे जेव्हा सादरीकरण केले जाते तेव्हा नभोवाणीच्या माध्यमाच्या मागणीनुसार काही मूलभूत फरक बदल केला जातो.
कथेतील महत्त्वाचा घटक म्हणजे भाषाशैली होय श्रुतिका लेखन करणाऱ्या लेखकाला पात्राची भाषा निवेदकाची भाषा यांचा सखोल अभ्यास करावा लागतो कारण प्रत्यक्ष लिखित कथेमध्ये निवेदक हा वाचकांशी संवादी असल्यामुळे तो वाचकाच्या बुद्धिमत्तेला गृहीत धरीत असतो त्यामुळे काही संज्ञा ज्या ज्ञानाच्या मागणीची अपेक्षा करीत असतात त्याची तो मांडणी करतो परंतु नभोवाणी माध्यम हे सर्वसामान्य माणसाच्या आस्वादाचा घटक असल्यामुळे श्रुतिका लेखन करणाऱ्या लेखकाला श्रुतीच्या बुद्धिमत्तेला गृहीत धरून चालत नाही श्रुतीकेतील कथेचा आस्वाद श्रोत्याला सहज सोप्या पद्धतीने घेता यावा यासाठी कठीण संज्ञा संकल्पना वापरणे धोक्याचे असते अशावेळी प्रतीक प्रतिमा संज्ञा यांची उकल करून श्रोत्याला सोप्या पद्धतीने कथेच्या आस्वादासाठी मदत करावी लागते
नभोवाणीवरील श्रुतिका लेखनाचा विशिष्ट कालावधी निश्चित करण्यात आलेला असतो. जेव्हा एखादी कादंबरी, महाकादंबरी नभोवाणीवरून सादर केली जात असते. तेव्हा ती क्रमशः स्वरूपात सादर होते. परंतु एका सलग अर्ध्या तासामध्ये एखादी कथा सादर करण्याची जबाबदारी जेव्हा श्रुतिकालेखकावर येते तेव्हा वेळेची मर्यादा लक्षात घेऊन कथेची मांडणी करावी लागते. कथा शब्दबंबाळ होता कामा नये. तसेच ती अतिवेगात सादर करावी लागता कामा नये. पात्राच्या संवादातून कथा मांडली जात असताना संवादाच्या सादरीकरणाचा वेग सुद्धा सहज स्वाभाविक असावा लागतो. या दृष्टीने श्रुतिका लेखकाला श्रुतिका सादर करीत असतानाच्या स्टुडिओतील सर्व यंत्रणांचा माध्यमातील मर्यादांचा अभ्यास करावा लागतो. किंबहुना त्याला किमान या माध्यमातून काम करणाऱ्या कारागिरांच्या कार्यपद्धतीचा परिचय असावा लागतो
श्रुतिका लेखकाने श्रुतिका सादर करीत असतानाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला सामावून घ्यायला हवे, किंबहुना त्या प्रक्रियेचा साक्षीदार म्हणून तिथे हजर असायला हवे. त्यामुळे श्रुतिका लेखकाला वेळेची मर्यादा, सादरकर्त्याची शैली, शब्दफेक, शब्दांच्या उच्चारातील सोपेपणा/कठीणपणा या घटकांचा परिचय करून घेणे अत्यावश्यक असते.
जसे एखाद्या निबंधामध्ये आपण दोन वाक्य जोडण्यासाठी ‘आणि’ ऐवजी ‘व’ या उभयान्वयी अव्ययाचा वापर करतो. परंतु नभोवाणीवर ‘व’ या उभयान्वयी अव्ययाचा वापर करून चालत नाही. कारण आपण नेहमीच्या बोलण्यामध्ये ‘व’ या उभयान्वयी अव्ययाचा वापर करीत नसतो. अशा प्रकारे लिखित आणि मौखिक साहित्यकृतीतील फरक नभोवाणीवर लेखनाचे काम करणाऱ्या लेखकाला समजून घ्यावे लागतात.
श्रुतिका आणि चिंतन या दोन कलाकृती आणि त्यातील फरक समजून घ्यावे लागतात. नभोवाणीवर सुरुवातीच्या काळात श्रुतिका याचा अर्थ छोटी गोष्ट किंवा चिंतनअसे होते. ज्यामध्ये विशिष्ट पात्रांमधील संवाद आणि एखादा अनुभव व्यक्त करणे अपेक्षित होते. कालांतराने या प्रकारची जागा चिंतन या कलाप्रकाराने घेतली आणि श्रुतिका लेखन हे कथा मांडणीचा मर्यादित भाग बनले. ज्या पद्धतीने आपण ललित निबंध, कथा आणि नाटक यामध्ये फरक करतो तसाच फरक चिंतन, श्रुतिका आणि नभोनाट्य यामध्ये करावा लागतो. यातील सीमारेषा जरी धूसर असल्या तरी नेमकेपणाने याच्यातील फरक आपण दाखवू शकतो. चिंतन या लेखनप्रक्रियेमध्ये लेखकाने स्वातंत्र्य घेतलेले असते. निवेदकाऐवजी लेखकाचेच बोलणे त्यात महत्त्वाचे ठरते, तर श्रुतिका लेखनामध्ये निवेदक हा महत्त्वाचा असतो. त्याची वेगळी भूमिका निश्चित करावी लागते. नभोनाट्यामध्ये मात्र पूर्णपणे पात्रांच्या मार्फत सादरीकरण होत असते. या दृष्टीने चिंतन, श्रुतिका आणि नभोनाट्य यांच्यातील सादरीकरणाची शैली समजून घेणे आवश्यक ठरते.
संदर्भ -
श्रुतीकेची गोष्ट
https://www.maayboli.com/node/30034
आवडणाऱ्या मालिका आणि प्रेक्षक
https://www.maayboli.com/node/54721