Saturday, October 8, 2022

संगीत देवबाभळी - प्राजक्त देशमुख

 


संगीत देवबाभळी प्राजक्त देशमुख यांचे नाटक २०१८ मध्ये पुस्तक रूपाने प्रकाशित झाले. त्यानंतर तिसरे पुनर्मुद्रण २०२२ मध्ये झाले, अर्थात या नाटकाच्या लिखित संहितेची वाचकांची मागणी या पुनर्मुद्रनातून दिसून येते. संत तुकारामांच्या जीवनावर आधारित असलेले हे नाटक कौटुंबिक, धार्मिक आणि अधिभौतिक अशा संकल्पनांवर भाष्य करणारे आहे. हे नाटक समजून घेण्यापूर्वी संत तुकारामांच्या चरित्रात्मक जीवनपटाचा थोडक्यात परिचय करून घ्यावा लागतो. विशेषतः धर्मपीठ आणि संत तुकाराम यांचे वाद याविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेवर तसेच वर्णव्यवस्थेवर आपल्या लेखनाच्या आधारे आक्रमण करणारे संत तुकाराम समकालीन पुरोहित मंडळींच्या रोशास बळी पडले होते. धर्मपिठाने त्यांचे सर्व अभंग इंद्रायणी नदीत बुडवण्याचा न्याय/ शिक्षा दिली होती. चमत्कार सदृश्य बुडवलेले अभंग पुन्हा नदीवर तरंगू लागले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. ईश्वरभेटीची आस लागलेले संत तुकाराम विठ्ठलमय असल्यामुळे त्यांना चराचरात विठ्ठलाचे अस्तित्व जाणवते. पेशाने वाणी असलेले परंतु कालांतराने हा व्यवसाय बुडीत निघाल्यामुळे शेतीकडे वळलेले तुकाराम जेव्हा भक्ती संप्रदायात तल्लीन झाले, तेव्हा त्यांना सर्वप्रथम विरोध हा त्यांच्या घरातून त्यांच्या पत्नीने केला. परंतु हा विरोध कडवा /आक्रमक नव्हता तर तो लटका /भावनावाही स्वरूपाचा होता. संत तुकाराम आणि त्यांची पत्नी आवली यांच्यातील नातेसंबंधावर भाष्य करणारे प्रस्तुत नाटक आहे.


महाराष्ट्रात संत परंपरेची निरनिराळ्या स्वरूपाची ईश्वर प्रेरणा आढळून येते. वारकरी, महानुभाव, दत्त, दास अशा संप्रदायांनी महाराष्ट्रात भक्ती साहित्याची निर्मिती केलेली दिसते. अंदाजे तेराव्या शतकामध्ये महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचे अस्तित्व आढळून येते. महानुभाव संप्रदाय हा आंतरिक शक्तीची प्रेरणा जागृत करतो, तर वारकरी संप्रदाय भक्ती काव्य निर्माण करताना आढळतो. एकूणच वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्य माणसाला विठ्ठल भक्तीची आस निर्माण करणारे संत सर्वसामान्यांना ईश्वराच्या चरणाला स्पर्श करण्याची परवानगी देतात. त्यामुळे एकीकडे वर्णाश्रम धर्म, अस्पृश्यतेचे बंधन असलेली समाज रचना तर दुसरीकडे विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून ईश्वर भक्ती करणारी वारी ही संकल्पना हा परस्पर भेद महाराष्ट्रात आढळून येतो. या भक्ती संप्रदायाचे विविध पैलू आपल्याला तेराव्या शतकातील संत साहित्यात तसेच संत चरित्रात आढळून येतात. प्रस्तुत नाटकांमध्ये अशाच एका आख्यायिकेचे चित्र रेखाटले आहे. या संदर्भात आपल्याला दर्शन आणि वर्णन या संकल्पना समजून घ्याव्या लागतात. ईश्वराच्या मूर्तीचे वर्णन करणे ही संतांची प्रेरणा- प्रतिभा त्यांच्या अभंग ,ओवी, कवितांमध्ये आढळते. परंतु प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन हे वर्णनामध्ये नसून ते आत्मिक आनंद स्वरूप आहे. ते कुणाला दाखविता येणारे नाही. तसेच त्याचे वर्णनही शक्य नाही. संत तुकाराम या अवस्थेला 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशा शब्दात व्यक्त करतात. संगीत देवबाभळी या नाटकांमध्ये ईश्वराचे वर्णन करणारे संत तुकाराम तर आवलीच्या पायातील काटा काढणारा विठ्ठल तिला प्रत्यक्ष दर्शन देतो अशी कथा प्रसिद्ध आहे. प्रस्तुत नाटकांमध्ये याच कथेवर आधारित मांडणी केलेली दिसते. आत्मसाक्षात्कार असे या अनुभवाचे वर्णन केले जाते. ईश्वराने दर्शन देऊनही आवलीला याची जाणीव नाही अर्थात तिला आत्मसाक्षात्कार घडलेला नाही असे म्हणावे लागते.



संगीत देवबाभळी या नाटकाचे केंद्रवर्ती पात्र म्हणजे संत तुकारामांची पत्नी आवली हे आहे. तिला संत तुकारामांची विठ्ठलभक्ती पसंत नाही, कारण विठ्ठलामुळे तिच्या संसाराची वाताहात झाली आहे असे तिचे मत आहे. त्यामुळे ती वारंवार विठ्ठलाला अपशब्द उच्चारत त्याचे नाव घेत राहते. स्वाभाविकपणे तिच्या मुखातून विठ्ठलाचे नामस्मरण होत राहते. नकारात्मक स्वरूपाचे असले तरी ईश्वराचे नियमित- क्षणाक्षणाला नाव घेणारी, आठवण काढणारी आवली ईश्वराच्या दर्शनास पात्र होते. यासंदर्भात आवलीचे नकारात्मक तत्त्वज्ञान समजून घ्यावे लागते. 

आवली हे पात्र चर्चात्मक स्वरूपात व्यक्त झाले आहे, तिच्या पायातील काटा काढल्यानंतर तिला घरापर्यंत आणण्याचे काम लखुबाई अर्थात विठ्ठलाची (विष्णूची) पत्नी लक्ष्मी हिने केलेले आहे. प्रस्तुत नाटकात लखुबाई (लक्ष्मी) आणि आवली यांच्यातील संवाद महत्त्वाचा ठरतो. या संवादातून लक्ष्मीला स्वतःचे एकाकीपण जाणवते आणि आवलीचे नकारात्मक तत्त्वज्ञान सुद्धा समजते. आस्तिक आणि नास्तिक ही संकल्पना या संदर्भात समजून घ्यावी लागते. आस्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व स्वीकारणारा व्यक्ती तर नास्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नाकारणारा असा असतो. आवली ही ईश्वराला शिव्या शाप देते आहे, अर्थात तिने ईश्वराचे अस्तित्व मान्य केलेले आहे. ती विठ्ठलाला सगूणरूपात पाहते, आणि त्यामुळेच ती त्याला शिव्या शाप देऊ शकते. आवली जरी ईश्वराला शिव्या देत असली तरी तिने ईश्वराचे अस्तित्व नाकारलेले नाही. म्हणूनच तिची नकारात्मक भक्ती या साहित्यकृतीमध्ये महत्त्वाची ठरते.


रगत नाही आलं 

इंद्राणी पाणी बोटामध्ये 


अशा प्रकारच्या अभंग रचनेतून प्रस्तुत नाटकामध्ये इंद्रायणी नदीशी संबंधित असलेला जीवन व्यवहार मांडलेला आहे. जगण्याच्या सर्व प्रेरणा नदीकाठी असल्यामुळे नदीशी असलेला संबंध शरीराच्या रक्तासारखा आहे. अशा प्रकारच्या वर्णनातून लेखक ग्रामीण जीवन धर्माचे तसेच निसर्गमय होणाऱ्या मानवी प्रेरणांचे वर्णन करताना दिसतो.


भाकऱ्या हलक्या 

जसे फुकल्याचे पीस 

आलथी पालथी 

जणू दिस आणि रात 


आवली या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना लेखक तिच्या जीवनक्रमातील दैनंदिन कामकाजामध्ये असलेल्या प्रतीकात्मक जाणीवा मांडतो. भाकरी जणू काही दिवस आणि रात्र या दोन निसर्ग संवेदना मांडते आहे. आपल्या जगण्याशी निसर्गाचा जवळचा संबंध आहे, आपल्या ताटातल्या भाकरी पासून ते दिवस आणि रात्र या दैनंदिन रोजनिशीपर्यंत ईश्वराने निर्माण केलेल्या सर्व घटकांचे आपण पाईक असायला हवे, अशी भावना व्यक्त केली आहे.


निसर्गातील प्राणीमात्रांना त्रास होऊ नये म्हणून जंगलामध्ये जाऊन अभंग रचना करणारे, तसेच ईश्वरभक्ती करणारे संत तुकाराम प्राणिमात्रांना त्रास होऊ नये म्हणून चिपळ्या सुद्धा हळुवार वाजवतात- असा उल्लेख एका ठिकाणी होतो. तर माझ्या घरात विठ्ठलाची मूर्ती असता कामा नये अशी म्हणणारी आवली विठ्ठलाचा उल्लेख विटया, काळ्या,  पंढरीचे भूत,  पांड्या अशा प्रकारे करते. पायात घुसलेला काटा सुद्धा काळाच होता याचेही तिला वाईट वाटते आहे. आपल्या एकूणच जीवनार्थाला बिघडवणारा विठ्ठल आहे असे तिला वारंवार वाटत राहते, म्हणूनच तिच्यामुखांमध्ये नकारात्मक स्वरूपाचे का होईना पण विठ्ठलाचे नाव सतत असलेले लेखकाने मांडलेले आहे.

लखुबाई आणि आवली यांच्यातील संवादामधून आवलीचा विठ्ठलाप्रती असलेला राग आणि दुसरीकडे विठ्ठल पत्नी असलेली लक्ष्मी अर्थात लखुबाई आपल्या पतीबद्दल बोलले जाणारे अपशब्द सहन करावे लागत आहेत. याबद्दल ती मनामध्ये त्रागा करीत आहे. जेव्हा आवली कृष्ण आणि राधा यांच्या नाते संबंधाविषयी बोलू लागते तेव्हा लखुबाई मनातून खचू लागते. विठ्ठलावर अधिकार असलेल्या भक्तांमध्ये राधा आणि कृष्ण यांची भक्ती याविषयी असलेला जनसामान्यांमध्ये भाव लखुबाईला अर्थात लक्ष्मीला सहन होत नाही. प्रत्येक भक्ताला आपला ईश्वर हा आपल्यासोबत असायला हवा ही जाणीव लखुबाईला ईश्वरापासून वारंवार दूर ठेवते आहे. त्यामुळे आवलीपासून दूर असलेले तुकाराम आणि लक्ष्मीपासून दूर असलेला विष्णू अर्थात विठ्ठल यामध्ये आपल्याला आवली आणि लखुबाई यांचे दुःख समांतर असल्याचे जाणवते.


संगीत देवबाभळी या नाटकामध्ये देवबाभळी या झाडाच्या काट्याचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. आवलीच्या पायात शिरलेल्या देवबाभळीच्या काट्यामुळे ती तुकारामांना त्यांची न्याहारी पोहोचवू शकत नाही. तेव्हा स्वतः पांडुरंग येऊन तिच्या पायातील काटा काढतो आणि न्याहारी तुकारामांना नेऊन देतो. यादरम्यान आवलीला घरी घेऊन जाण्याचे काम पांडुरंग आपल्या पत्नीला रुक्मिणीला सांगतो. रुक्मिणी लखुबाईचे रूप घेऊन आवली सोबत तिच्या घरी तिची सुश्रुषा करण्यासाठी जाते. यादरम्यान दोघींमध्ये झालेल्या संवादामधून एकीकडे आवलीची नकारात्मक भक्ती तर दुसरीकडे लक्ष्मीची सकारात्मक भक्ती यांची तुलना केलेली दिसते. लक्ष्मी आवलीला असे विचारते की, तुझ्या संपूर्ण जगण्यामध्ये तू कधी मनसोक्त आनंद घेतला आहेस का? तिवडीच्या फुलांचा वास तू कधी अनुभवला आहेस का? मोकळेपणाने पावसाच्या पाण्यात भिजली आहेस का? मोठमोठ्याने मनापासून ओरडली आहेस का? या प्रश्नातून लक्ष्मी आवलीला अंतरंगात असलेल्या ईश्वराशी एकरूप होण्याविषयीचे तत्त्वज्ञान व्यक्त करते. प्रत्येकाची भक्तीची कल्पना वेगवेगळी आहे तरीही प्रत्येकाने आपापल्या वाट्याचे नांगरत राहिला हवे, तरच आवश्यक असलेले पीक निर्माण होऊ शकते. ईश्वर हा चराचरात आहे. पांडुरंग नावाच्या गाभाऱ्यातला ईश्वर अर्थात देहामध्येच वास करतो. त्याच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला मुळात निसर्ग प्रेरणांची एकरूप व्हावे लागते. आपल्या अवतीभवती असलेल्या निसर्गासोबतच आपल्या शरीरातल्या निसर्गाशी सुद्धा संवाद साधावा लागतो. आवली आणि लखुबाई यांच्यातील या संवादातून ईश्वर भक्तीच्या दोन परस्पर विरोधी संकल्पना मांडलेल्या दिसतात.




प्रस्तुत नाटकामध्ये आवलाई आणि लखूबाई यांच्या संवादातून असे आढळून येते की दोघीजणी एकमेकांशी ज्या विषयावर चर्चा करीत आहेत तो विषय हा त्यांच्या पतीशी संबंधित आहे, आवलाई संत तुकारामांशी एकरूप आहे तर लखुबाई ही विठ्ठलाशी परंतु दोघींनाही पती विषयीच्या आसक्तीबद्दल वाद आहेत, जे वाद चर्चेतून सुटतात. आवलाईचे तुकारामांच्या प्रती असलेले प्रेम तिच्या बोलण्यातून जरी व्यक्त होत नसले तरी मनातून ती तुकारामांशी सतत एकरूप असल्याचे दिसते. आपला संसार सुखाचा व्हावा असे वाटणारी आवलाई विठ्ठलालाउद्देशून अपशब्द वापरते. कारण विठ्ठलामुळेच संत तुकाराम भक्तीमय झालेले आहेत आणि संसारापासून दूर जाऊन विरक्ती स्वीकारत आहेत. संत तुकारामांचे व्यक्तिमत्व नेमके कसे आहे, त्यांची श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे याची जाणीव लखुबाईला असल्यामुळे ती संत तुकारामांची बाजू घेण्याचा प्रयत्न करते. परंतु कालांतराने तिला असे आढळून येते की आवलाई आणि आपण एकाच जहाजाचे प्रवासी आहोत. ज्या पद्धतीने विठ्ठलाशी आपण एकरूप आहोत, परंतु विठ्ठलाचे भक्त त्यामध्ये असलेली राधा, मीरा, संत तुकाराम आणि इतर संत यांच्यासाठी विठ्ठलाच्या मनामध्ये असलेले प्रेम आणि लखुबाईचे विठ्ठलाबद्दल असलेले प्रेम यांची तुलना करता येऊ शकणार नाही. एकूणच पतीविषयी एकरूप असलेल्या या दोन्ही स्त्रिया प्रस्तुत नाटकात व्यक्त होत असल्या तरी हे नाटक पुरुष केंद्री किंवा पुरुषप्रधान ठरत नाही. तर या नाटकातून भक्ती विषयीची दोन रूपे लेखकांनी मांडलेली आहेत

नाटकाच्या शेवटच्या प्रसंगांमध्ये लखूबाई आवलाईच्या जखमेवरची चिंधी काढून घेते आणि जखम भरली असल्याचे नमूद करते. आवलाई झोपलेली असल्यामुळे आता तिची सुश्रुषा करण्याची गरज नाही या उद्देशाने लखुबाई विठ्ठलाची मूर्ती घेऊन निघून जात असते. परंतु जाण्यापूर्वी ती मूर्ती तिथेच ठेवून फक्त हातात चिंधी घेऊन लखूबाई निघून जाते. विठ्ठलाच्या मूर्तीभोवती चैतन्यमय वातावरणाचा प्रकाशझोत पडतो आणि नाटक संपते. या प्रसंगातून लेखकाला असे व्यक्त करायचे आहे की, विठ्ठलाची प्रतिमा लखूबाई आवलाईच्या घरात ठेवून निघताना त्या मूर्तीबद्दल असलेले तिचे आकर्षण मनातून संपुष्टात आलेले आहे. चिंधीच्या रूपाने तिने स्वीकारलेले सुश्रुतेचे व्रत तिने मान्य केले आहे. आवलाई आणि लखूबाई यांच्या संवादातून लखूबाईचे मन तिच्या इच्छा, आकांक्षा यामध्ये परिवर्तन घडलेले दिसते. ज्या मूर्तीसाठी, विठ्ठलाच्या भक्तीसाठी ती अवलाईशी भांडत आहे, तीच मूर्ती लखुबाई आवलाईच्या घरात ठेवून निघते आहे. आवलाईची भक्ती केवळ लखूबाईला कळलेली नाही, तर एकूणच स्वतःच्या जीवनातील विठ्ठलाचे अस्तित्व जे सगुण रूपात आपल्या सोबत अपेक्षित आहे. त्याचा ध्यास तिला समजलेला आहे. मूर्तीमध्ये ईश्वर शोधणाऱ्यांना कदाचित ईश्वराचे अस्तित्व निर्गुण निराकार रूपात जाणवू शकते. परंतु आवलाई खरे पाहता ईश्वराला विरोध करत आहे, परंतु तिच्या भेटीला विठ्ठल सगुण रूपात अवतरतो. ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. विठ्ठलाचे सगुण अस्तित्व आवलाई मान्य करते त्यामुळेच तो तिला सगुणरूपात दर्शन देतो असा आशय येथे महत्त्वाचा ठरतो.




प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 

दिनांक  - ९ ऑक्टोबर २०२२ 

आश्विन पौर्णिमा , कोजागरी पौर्णिमा शके १९४४ 






Monday, October 3, 2022

पुरोगामी - राकेश वानखेडे

 

एक दोन अ,  मसनद, गिनीपीग, पुरोगामी या कादंबऱ्यांचे लेखक राकेश वानखेडे हे वास्तववादी, प्रयोगशील लेखक म्हणून प्रसिध्द आहेत.  समकालीन वास्तवाचे परिक्षणकार आणि कथनपर माध्यमातून व्यक्त होणारे भाष्यकार अशी त्यांची ख्याती आहे. प्रगतिशील लेखक संघासारख्या सामाजिक, साहित्यिक चळवळीचे ते प्रवर्तक आहेत.  आधुनिक, सायबर विश्वाकडे ते अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक दृष्टीकोनातून पाहतात,  त्यांच्या कादंबरीलेखनामध्ये आपल्याला गेल्या पाच ते दहा दशकातील घडामोडींचा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास भाष्यस्वरुपात अनुभता येतो.  प्रयोगशील लेखक म्हणूनही ते प्रसिध्द आहेत.  ‘पुरोगामी’ या त्यांच्या कादंबरीची चिकित्सा करीत असताना त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आणि शैलीचेही परिक्षण करणे अपेक्षित आहे. 

पुरोगामी या कथेचा नायक शुध्दोधन शिवचरण आपल्या अंतर्मनाशी अर्थात धना या आत्मपर पात्राशी संवाद साधत कादंबरीचे निवेदन करतो.  प्रथमपुरुषी असलेली ही कादंबरी त्यामुळेच प्रयोगात्मक पातळीवर उभयपुरुषी बनते. एकाच पात्राच्या दोन परस्पर विरोधी तर कधी समांतर भूमिका, मते मांडताना या कादंबरीमध्ये संज्ञाप्रवाहाच्या पातळीवरील कथनात्मकता व्यक्त होते.  ही कथनशैली लेखकाने विविध राजकीय, सामाजिक आणि अधिभोतिक क्लिष्ट विषयांचे विवेचन करण्यासाठी जाणीवपूर्वक वापरलेली आहे असे आढळून येते. 

कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेल्या शुध्दोधनचे वडील १९५६च्या धम्मपरिवर्तनाच्या चळवळीत सामील झालेले असल्यामुळे ते आपल्या मुलाचे नाव शुध्दोधन ठेवतात.  मात्र त्याची आई त्याला धनू या नावाने संबोधते.  शुध्दोधन, धनू आणि धना अशा नावाने संबोधीत होणारे या कादंबरीचे केद्रवर्ती पात्र आंबेडकरी चळवळ, धम्म परिवर्तन, कम्युनिस्ट विचारधारा, काॅग्रेसचे राजकारण, शरद पवारांचे राजकीय धोरण अशा विषयांचे ऐतिहासिक पुरावे देत विवेचन करते. त्यामुळे या कादंबरीमध्ये अंदाजे पाच ते दहा दशकातील राजकीय स्थित्यंतराचेही परिक्षण केलेले आढळते आहे.

पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहासाचा दस्तऐवज म्हणून पुरोगामी या कादंबरीचे विशेष महत्व आहे.  कारण १९७० त १९९० पर्यतच्या काही महत्वपूर्ण चळवळी आणि त्यांच्या कार्यपध्दती, यश-अपयश यावर कादंबरीत चर्चा केलेली दिसते. आंबेडकरवाद, साम्यवाद, समाजवाद, मार्क्सवाद, पॅंथर, डावे-उजवे, लाल बावटा, ओबीसी चळवळ, आरक्षण याविषयीच्या घडामोंडी आणि त्यावर भाष्य निवेदक करतो.  त्यामुळे समकालीन चळवळीच्या यशापयशामागील वास्तव प्रकट करण्यात आलेले आहे.  लेखकाने या निमित्ताने ३० ते ४० चळवळींचा अभ्यास केलेला आहे.  प्रत्येक चळवळीची चिकित्सा करताना निवेदक दोन्ही बाजूच्या विचारांवर सप्रमाण भाष्य करतो. त्यामुळे काही ठिकाणी वाचकांवर न्यायदानाची जबाबदारी सोपवलेली दिसते. 

‘जय भीम... मी शुध्दोधन शिवशरण.. पण माही माय मला धना म्हणते. उमर सहासष्ठ. सदतीस वर्षे रेल्वेत इमानदारीत नोकरी करुन, रेल युनियनची जबाबदारी पार पाडून आता रिटायर्ड.  पण इतरांसारखं घरात बसून नाही. कारण चळवळ.  दलित पॅंथर मुव्हमेंट.’ -  या निवेदनातून स्वत:ची ओळख करुन देणारा शुध्दोधन यवतमाळ जिल्हयातील आत्महत्या, दलित पॅंथर चळवळीतील आक्रमकपणा,  बुध्दाची शिकवण अशा कधी समांतर तर कधी परस्पर विरोधी विधानांतून वाचकाला एकाच वेळी परस्पर भिन्न विचारव्यूहांवर दृष्टीक्षेप टाकायला लावतो. “आमचं काही धड नाही... आम्ही आंबेडकरवादी…” अशा विधानातून निवेदक आपल्या एकूणच वैचारिक अस्थिरतेविषयी आणि सामाजिक स्थितिगतीविषयी भाष्य करतो.  आंबेडकरवाद, पुरोगामी विचारसरणी यांची व्याख्या करीत विचारचक्राला गती निवेदक देतो.  त्यामुळे वाचकाला या कादंबरीतील घटनाक्रमापेक्षा विचारचक्र, दृष्टीकोन आणि तत्वचर्चा यामध्ये गुंतणे आवडू लागते.  किंबहुना वाचकाची तशी अभिरुची विकसित व्हावी असा लेखकाचा उद्देश दिसून येतो

‘पुरोगामी’ या कादंबरीच्या मनोगतामध्ये लेखकाने आपल्या लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेली दिसते. वर्तमान स्थितीमध्ये त्याला असे आढळून येत आहे की, भूतकाळातील समस्या - संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या विचारधारा आजच्या तरुण पिढीला ज्ञात नाहीत, किंबहुना ही नवी पिढी जुन्या नव्यातील संघर्षापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. एकूणच विचारधारेची नामुष्की असे या अनुभवाबाबत लेखकाला वाटते.  नवीन पिढीला दोष देण्याऐवजी लेखक स्वतःच्या आणि स्वतःच्या आधीच्या पिढीचेच दोष व्यक्त करतो. तो असे म्हणतो की "आमच्या पिढीच्या हाती निर्भिड आंदोलने सोपवणे माझ्या आधीच्या पिढीला जमले नाही." काळानुसार समस्यांची मांडणी बदलत जाते, त्यानुसार चळवळीची भूमिका सुद्धा बदलणे अपेक्षित असते. लेखक एका ठिकाणी असे लिहितो की, "वयोमानाने रॅडिकल संवेदना थंडावतात काय? अशी थंड आणि गब्बर झालेली भली मोठी स्पेस पुरोगामी चळवळीत आहे."

पुरोगामी चळवळीचे नेतृत्व करीत असताना या चळवळीतील दोष सुद्धा दाखवून देण्याची भूमिका लेखकाने स्वीकारलेली दिसते. काळाने निर्माण केलेले प्रश्न आणि त्याची काळाकडूनच अपेक्षित असलेली उत्तरे - असे जेव्हा समाज अपेक्षित करीत प्रवास करतो तेव्हा तो आंधळेपणाने परिस्थितीशरण बनलेला असतो. पुरोगामी चळवळीचे सुद्धा काही काळामध्ये असेच चित्र निर्माण झाल्याचे लेखकाने नोंदवलेले आहे. तो असे म्हणतो की “माझ्या पिढीला माझ्या पूर्वासुरीनी प्रश्नांच्या गर्जेत लोटले, आता उलट आमच्याकडेच उत्तरे मागू नका. आम्हाला प्रश्नच नीट आणि धडपणे उभे करू द्या. उत्तरांच आपण नंतर बघू. कदाचित येणारा काळच उत्तर घेऊन येईल. अशा संक्रमण काळी प्रश्न समजून घेणं फार महत्त्वाचं असतं.” आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद या दोन विचारव्यूह स्वतःच्या वेगवेगळ्या चुली मांडल्यामुळे प्राथमिक चुका घडलेल्या आहेत. या दोन्ही विचारमंचांनी रीथिंगची प्रक्रिया गतिमान करणं ही काळाची गरज आहे असे लेखकाला वाटते.

‘पुरोगामी’ या संकल्पनेची व्याख्या करण्याचा प्रयत्न कादंबरीतील निवेदकाने वारंवार केलेला आढळतो. "इतिहासात पुरुषाने आपली आव्हाने आणि आवाहने तडीस नेण्यासाठी ज्या गटाची निवड केली तो गट म्हणजे पुरोगामी होय, जेव्हा धर्मसत्ता, राजसत्ता, ज्ञानसत्ता, धनसत्ता आणि कर्मसत्ता या सत्ताभ्रष्ट होतात तेव्हा त्यांचं कार्य प्रकर्षाने तेथून सुरू होतं तो गट म्हणजे पुरोगामी होय." अशा प्रकारच्या व्याख्या करीत कादंबरीचा निवेदक आपल्या पूर्वासुरीच्या नेतृत्वावर आक्षेप घेतो, की त्यांनी किमान अशा प्रकारच्या व्याख्या तयार करायला हव्या होत्या. 

व्यवस्थेशी ४० वर्ष अहोरात्र टक्कर देणारा प्रस्तुत कथेचा नायक-निवेदक आपण केलेल्या कर्तृत्वाचा पश्चाताप होऊ देत नाही. किंबहुना ‘आपली बांधिलकी हा आपला अंत:कलह असतो, जनाशी-मनाशी वास्तवाशी आदर्शाशी सामना असतो. हाच सामना प्रकर्षाने समाज वास्तवाशी जोडू पाहणाऱ्यास पुरोगामी म्हटले जातं,’ असे मत त्यांनी मांडलेले दिसते.

दलित चळवळीचे अपयश नोंदवताना जात नष्ट न करणारी व्यवस्था, हुकूमशाही, भ्रष्टाचार आणि निरनिराळ्या वाद-विवादाचे महाराष्ट्र किंबहुना भारतातील अपयश ही कादंबरी भाष्य स्वरूपामध्ये व्यक्त करते.  कादंबरीतील निवेदक प्रामुख्याने आंबेडकरवाद, मार्क्सवाद, साम्यवाद आणि पुरोगामी विचारधारा यांची चिकित्सा करताना आढळतो.   भारत डिकास्ट कधी होणार? हा प्रातिनिधिक प्रश्न निवेदकाने वारंवार उपस्थित केलेला दिसतो..   मार्क्सला भगवान बुद्ध हे उत्तर आहे,  हि विचारधारा भारताच्या राजकारणात जशी रुजवली गेली तसा कम्युनिस्ट पक्ष कमकुवत होऊ लागला आणि काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवित झाला.   एखाद्या विचारधारेमुळे किंवा वैचारिक विधानांमुळे राजकारण, समाजकारणात किती आमुलाग्र बदल होऊ शकतो याचे हे उदाहरण ठरते.. कादंबरीतील शुद्धोधन आणि त्याची सावली धना यांच्यातील संवादातून मार्क्सवाद, काँग्रेसवाद आणि आंबेडकरवाद यांची वारंवार चिकित्सा केली जाते.

‘पुरोगामी’ या कादंबरीची चिकित्सा करीत असताना वास्तवातील काही व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून घ्यावा लागतो. यामध्ये शहरी नक्षलवाद या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबळे तसेच सचिन माळी या दोन चळवळीतील नेते मंडळींचा संदर्भ लक्षात घ्यावा लागतो. आनंद तेलतुंबळे यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली आणि अद्यापही त्यांची सुटका करण्यात आलेली नाही यातून व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींना कशाप्रकारे राजसत्ता त्रस्त करते हे दिसून येते. ‘पुरोगामी’ या कादंबरीचा नायक सुद्धा अशाच पद्धतीने सरकारकडून नजर कैदेत आणि त्यानंतर प्रत्यक्ष कैदेमध्ये बंदिस्त केलेला आहे. कादंबरीचे थोडक्यात कथानक समजून घेताना असे आढळून येते की निवृत्तीनंतर काही आदिवासींचे  प्रश्न आणि राजनीती करणाऱ्या लोकांनी राबवलेली भ्रष्ट अर्थनीती याविषयीचे आंदोलन करणारा प्रस्तुत कथेचा नायक सुरुवातीस नजर कैदेत ठेवला जातो आणि त्यानंतर तो प्रत्यक्ष अटक करून कैदे ठेवला जातो.  त्याच्या चळवळीच्या प्रवासाचे वर्णन पुरोगामी या कादंबरीचे कथानक आहे.



कादंबरीच्या कथानकाचा विचार करताना असे आढळून येते कि, ही कादंबरी शुध्दोधन शिवशरण या पात्राच्या तरुणपणापासून ते सेवानिवृतीच्या काळपर्यंतच्या घटनाक्रमाचे वर्णन करते.  यामध्ये शिवचरणचा आंतरजातीय प्रेमविवाह, त्याने सहभाग घेतलेले आंदोलन,  त्याचे अनुयायी, मित्र यांच्याशी झालेला संवाद, त्याच्या अनार्य आणि मागधी या अनुक्रमे मुलगा आणि मुलींचे शिक्षण, त्यांचा आंतरजातीय विवाह, त्यांनी निवडलेली क्षेत्रे आणि विचारधारा, वडीलच्या चळवळीच्या स्वभावामुळे देश सोडण्याचा अनार्यने घेतलेला निर्णय, शिवचरणला नजरकैदेत ठेवणे, बिंबळवाडा प्रकल्पग्रस्तांसाठी त्याने चर्चा, भाषणे, पायपीट करणे,  शिवचरणऐवजी सिद्धाप्पाला एन्काऊंटरमध्ये ठार करणे,  त्यानंतर शिवचरण अटक होणे.  या घटना कथासूत्र मांडतात,  या मध्ये ३० ते ४० वर्षाचा काळ मांडलेला आहे.  निवेदकाने जाणीवपूर्वक काही काळाचे पट गाळलेले आहेत. यामध्ये शिवचरणचे तरुणपण, अनार्य आणि मागधीचे बालपण,  शिवचरणच्या पत्नीची मनोभूमिका यासंदर्भात वर्णन केलेले नाही.  याचे कारण ३०/४० वर्षाचा पट मांडताना निवेदकाची भूमिका शिवचरणच्या विचारधारेच्या प्रवासाविषयी चिंतन करणारी आहे.  त्यामुळे प्रत्येक पात्र या चिंतानाच्या प्रवासातील एक वैचारिक घटक किवा मुद्दा म्हणून महत्वाचा ठरतो.   यामध्ये पत्नी निलकांती,  कम्युनिस्ट कार्यकर्ता विनय अष्टपुत्रे, डॉ. प्रज्ञा, शुद्धोधनची सख्खी मोठी पुतणी सुजाता, गडचिरोलीतील त्याच्याच पेरीमेली गावात पोलिसांनी  नक्षली मानून एन्काऊंटर केलेला सुजाताचा नवरा सिद्धाप्पा ही पात्रे  शिवचरणच्या जीवनप्रवासात  त्याच्या विचारधारेचे सोबती आहेत. 


आंतरजातीय प्रेम विवाह नक्षलवाद, परिवर्तनवादी विचारधारा, मार्क्सवाद याविषयी प्रस्तुत कादंबरी मधील काही विधाने वैचारिक मतभेदाचे तसेच विचारधारेतील सकारात्मक आणि नकारात्मक मुद्द्यांचे विश्लेषण करताना दिसतात, "बुद्धाचे एकूण मूल्यांकन तुम्ही केवळ धार्मिक आणि पौराणिक संचित एवढेच घेतले आहे असे वाटते, त्यावर विनयजी  मला म्हणाले, "शुद्धोधना मार्क्स म्हणतो धर्म ही अफूची गोळी आहे" अशा चर्चेतून बुद्ध विचारसरणी आणि मार्क्स विचारसरणी यांच्यातील द्वंद्वाची चर्चा केली जाते. आंतरजातीय प्रेमविवाहामध्ये सुद्धा जेव्हा कर्मकांड विषयक वाद होतात तेव्हा पुरोगामी विचारधारेचे अपयश निवेदकाला दिसून येते. अशा प्रकारची सामाजिक दरी निवेदक मांडताना दिसतो. १९७६ च्या दरम्यान विदेशी देणग्या नियमन कायद्यामुळे एनजीओ.चा सुळसुळाट झाला. त्यामुळे निर्माण झालेला भ्रष्टाचार याविषयी सुद्धा निवेदक आपले परखड मत मांडताना दिसतो. एकीकडे वृत्तपत्रीय स्तंभलेखन राजकीय स्थितीगतीसाठी आवश्यक असते, मात्र आजच्या काळात ट्विटर, गुगल, फेसबुक, ब्लॉग आणि व्हाट्सअप हे सुद्धा पर्यायी माध्यम उभे राहिल्याचे निवेदकाने स्पष्ट केले आहे.

व्यवस्थेच्या प्रत्येक घटकांमध्ये पुरोगामी विचारसरणीचे व्यक्ती असायला हवे त्याशिवाय पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचणार नाही असे मत मांडणारा शिवचरण शरद पवार यांच्या विचारधारेवर सुद्धा टीकात्मक पवित्रा घेतो. भालचंद्र नेमाडे यांच्या ज्ञानपीठ पुरस्काराविषयीच्या मताबद्दल तसेच साहित्यिक चळवळींमध्ये सक्रिय असलेल्या विविध व्यक्तिमत्वांबद्दल प्रस्तुत कथेचा नायक आपले विचार मांडताना दिसतो. पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना समविचारी इतर विचारधारेची माणसे जवळ नको असतात, त्यांची एकला चलो ही भूमिका त्यांच्या अपयशास कारणीभूत आहे. अशी चर्चा केलेली दिसते. वाढत्या भांडवलशाहीचे रूप ओळखणे मार्क्सवादी आणि समाजवादांना जमलं नाही - असे निवेदन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्सवाद आणि बुद्ध विचारसरणी यांचा केलेला अभ्यास आणि त्यातून निर्माण केलेला आंबेडकरप्रणित बुद्ध धर्म ज्याच्या अनुयायासाठी पुरोगामी विचारधारेने झटायला हवे असे विचार मांडलेले दिसतात.. 

एकंदर पुरोगामी ही कादंबरी चिंतनाच्या पातळीवर वाचकांमध्ये आमुलाग्र बदल घडवत सर्वसामान्यतः सामाजिक, वैचारिक आणि तात्विक विचारधारेचे अवलोकन करीत वास्तववादी शेवटाकडे आलेली दिसते. कादंबरीच्या नायकाला अटक होणे हा वास्तववादी शेवट कादंबरीला परिपूर्णतेकडे घेऊन जातो. 

प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
अश्विन शुद्ध ८, दुर्गाष्टमी शके १९४४

भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...