Friday, September 23, 2022

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट


मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट या कादंबरीचे लेखक सतीश तांबे हे मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत.  एम ए अभ्यासक्रमात त्यांना सौंदर्यशास्त्र या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळाले होते.  त्यांच्या लेखनाची सुरुवात कवितांपासून झाली, नंतर त्यांनी वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन व सदरलेखन केलं, त्यांची साप्ताहिक दिनांक मधील मोकळीक तसेच आपलं महानगर या सायंदैनिकातील हळक्षज्ञ आणि लगोरी ही सदर विशेष गाजली.  कथांसोबत त्यांनी एकांकिका लेखन केलं आहे, तसेच विचक्षण संपादक म्हणूनही काम केलं आहे.  आजचा चार्वाक-दिवाळी अंक आणि अबब, हत्ती हे लहान मुलांचे मासिक यांच्या संपादनात यांचा मोलाचा वाटा आहे. ‘राज्य राणीचा होत’, ‘माझी लाडकी पुतना मावशी’, ‘रसातळाला खपच’, ‘मॉलमध्ये मंगोल’, ‘नामा निराळे’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.  २०१३ सालचा सार्वजनिक वाचनालय, नाशिक तसेच सवायी लेखक पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठान त्यांना प्राप्त झालेला आहे.  सतीश तांबे हे मराठीतील महत्त्वाचे लिहिते लेखक असून कथालेखक व संपादक अशी त्यांची वाचकांना ओळख आहे. वास्तव व कल्पना यांची सरमिसळ, सूक्ष्म विचार आणि चिंतन मनन यांची बांधेसुद रचना म्हणजे त्यांच्या कथा असतात, म्हणूनच ज्येष्ठ समीक्षक म.द. हातकणंगलेकर  यांनी तांबे यांच्या कथांना नवकथांच्या पलीकडे जाणाऱ्या कथा असे म्हटले आहे. 


मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट या सतीश तांबे यांच्या कथासंग्रहामध्ये एकूण पाच कथा असून या कथा अक्षर दिवाळी अंक, डिजिटल दिवाळी अंक, मौज दिवाळी अंक, मानिनी आणि शब्द दिवाळी अंक या नियतकालिकांमधून २०१५ ते २०१८ या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या आहेत. 


  • यत्र तत्र सावत्र 

  • नाकबळी 

  • मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट 

  • संशय कल्लोळात राशोमान 

  • रावण आडनावाच्या पांडव पुत्राच्या नावाची जन्म कथा 


या कथांचा समावेश या कथासंग्रहामध्ये केलेला आहे. या कथांच्या शीर्षकावरूनच आपल्याला लेखक सतीश तांबे यांच्या लेखन शैलीचा परिचय घडायला लागतो. अपारंपारिक असलेली ही नावे आशयातील नावीन्य तसेच वाचकाची अभिरुची आणि ओढ टिकवून ठेवतात. सावत्रपणावर भाष्य करणारी ‘यत्र तत्र सावत्र’ ही कथा मानवी नातेसंबंधावर भाष्य करते, तर ‘नागबळी’ ही कथा मानसशास्त्रीय अंगाने मानवी वासनेचा परामर्श घेते. ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ या कथेमध्ये लेखन प्रेरणेची नवी संकल्पना शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.  ‘संशय कल्लोळात राशोमान’ ही कथा आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांविषयी संशय व्यक्त करणाऱ्या पात्राभोवती तसेच नाटक, चित्रपट या क्षेत्रात संबंधी चिंतन करणारी आहे. ‘रावण आडनावाच्या पांडव पुत्राच्या नावाची जन्म कथा’ ही कथा महाविद्यालयीन पेपर सादरीकरण तसेच महाभारत आणि रामायण यांच्यातील पात्रांविषयी धर्म, श्रद्धा, रूढी, परंपरा या विषयी चिंतन करणारी आहे.

लेखक सतीश तांबे यांची लेखन शैली त्यांच्या कथेच्या आधारे अभ्यासक असताना उपरोक्त कथासंग्रहातील कथांचा आधार महत्त्वाचा ठरतो. कारण या पाच कथांमधून लेखकाच्या निरनिराळ्या भूमिका विचार आणि जीवनदृष्टी मांडण्यात आलेली आहे. विशेषतः सामाजिक स्थितीगतीविषयी लेखक जो विविध अंगानी विचार करतो त्याचे स्वरूप या कथांमधून स्पष्ट होताना दिसते. ‘यत्र तत्र सावत्र’ ही कथा जरी सावत्रपणाविषयी असली तरी या कथेत लेखकांनी विविध विषयांवर आपले मत नोंदविले आहे. प्रस्तुत कथेतील नायक श्रीपाद कर्तव्यदक्ष आणि कुटुंबवत्सल आहे. आपल्या आईवर त्याचे नितांत प्रेम आहे. परंतु तरुणपणातच त्याला असे कळून येते की आपली आई ही सावत्र असून आपली बहिण सुद्धा सखी बहिण नाही. सावत्र आई भविष्यात त्याच्या असणाऱ्या घरावर स्वतःचा आणि स्वतःच्या मुलीचा अधिकार मागते.  श्रीपादसुद्धा तिला वचन देऊन टाकतो. आपले स्वतःचे घर असावे. निष्पाप, निर्व्याज प्रेम करणारी आपली माणसे असावीत. या जाणिवेतून तो स्वतःचे घर बांधण्याचा निर्णय घेतो. चांगल्या पगाराची नोकरी असल्यामुळे तो ग्रामीण भागात गृहसंकुल उभारण्याच्या प्रकल्पात सामील होतो. त्याचा मुलगा प्रदेशात शिक्षणाला गेल्यामुळे त्याची ग्रामीण भागाकडे ओढ कमी आहेत. पत्नी सुद्धा ग्रामीण निर्जन बंगल्यात जाण्यासाठी तयार नाहीत, त्यामुळे वर्षातून एकदा होळीच्या निमित्ताने तो या बंगल्यात जातो. आपण तयार केलेले हे घर आपल्या हक्काचे आहे. सावत्रपणाचे नाही या जाणिवेतून तो आनंदी आहे. परंतु जेव्हा त्याला असे समजते की घर सांभाळायला ठेवलेले कुटुंब या घरावर भावनिक मालकी सांगते आहे.  शहरातून गावाकडे घर बांधायला आलेल्या कुटुंबाविषयी शिव्या शाप देत आहे. अशा स्थितीत श्रीपाद मानसिकदृष्ट्या खचतो. एकूणच त्याच्या मनातील सावत्रपणाचा भाव वाढत जातो, ‘यत्र तत्र सावत्र’ या कथेतील कथानक मानवी नातेसंबंधातील ताण मांडणारे आहे.

श्रीपाद हे पात्र शहरातील उच्चभ्र पांढरपेशी लोकांचे नेतृत्व करणारे आहे. या आर्थिक गटांमध्ये आपल्याला आपल्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याचा प्रघात दिसून येतो. लेखकाने याचे विशेष चिंतन केलेले दिसते. या सामाजिक प्रश्नाला ब्रेनड्रेन असे म्हणतात. भारतातील बुद्धिवंतांना परदेशाची ओढ लागली आणि त्यांनी परदेशात स्थायिक होणे यात आपल्या देशाचे नुकसान होते. ब्रेनडेन ही संकल्पना यावर भाष्य करते. ज्या मुलांच्या आधाराने वृद्धत्वाचा आसरा शोधायचा असतो. तीच मुले परदेशी स्थायिक झाल्यामुळे भारतात वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली दिसते.  श्रीपादने तयार केलेला बंगला आज वृद्धाश्रम ठरणार आहेत. तसेच ग्रामीण पार्श्वभूमीवर जमीन विकायची की राखायची असा एक मूलभूत प्रश्न निवेदकाने मांडलेला आहे.

प्रस्तुत कथेमध्ये नायकाला स्वतःच्या तरुणपणातच मृत्युपत्र तयार करावे लागते.  आपल्या सावत्र आईला दिलेल्या वचनामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागतो.  एकीकडे मानवी नातेसंबंधांमुळे जोडली गेलेली भारतीय कुटुंब व्यवस्था आर्थिक व्यवहारामुळे मोडकळीस आलेली आहे, तर दुसरीकडे जास्त आर्थिक सुबत्ता मिळवल्यामुळे माणसे नात्यांमधल्या सावत्रपणा जोडू पाहत आहेत अशी स्थिती लेखक चित्रित करतो. ‘राहील त्याचे घर’ ही एक कल्पना कथेच्या अनुषंगाने लेखक मांडतो.  अति श्रीमंत गटामध्ये विपुल प्रमाणात निवारा आहे, पण गरीब घरामध्ये राहायला जागा नाही. अशा स्थितीत राष्ट्रीय  संपत्तीचा समान वाटा करायला हवा असा मार्क्सवादी विचार या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो. 



कथेच्या नायकाचे घर एका ग्रामीण गरीब  कुटुंबाने स्वतःचे समजले आहे.  ज्या शेती कामासाठी जमीन आवश्यक आहे, तिला नापीक ठरवून कागदोपत्री त्या जमिनीवर व्यावसायिक आणि गृहनिर्माण संकुलाची परवानगी मिळविणे, त्यांची विक्री करणे, त्यावर गृहसंकुल उभारणे, या भ्रष्ट कामकाजामुळे एका प्रकारे आपण निसर्गावर आक्रमण करीत आहोत.  राहण्यासाठी जरी आपण येणार नसलो तरी शेत जमिनीवर बांधकाम करून आपण निसर्गावर आक्रमण केले आहे, म्हणूनच हे बंगले अभद्र आहेत असे नमूद केलेले दिसते.  कथेमध्ये एका बंगल्याचा उल्लेख भूतबंगला असा केला जातो.  जमिनीचा वाद हा महाभारतातील कौरव पांडवांपासून सुरू आहे.  प्रत्येकालाच अधिकार अढळ स्वरूपात हवे असतात, परंतु प्रत्यक्षात ते शक्य होत नाही.  प्रस्तुत कथेतील नायक श्रीपाद असल्या अढळपदाच्या कडेलोटापाशी आलेला आहेत.  स्वतःच्या घरातून तो स्वतःहून हद्दपार झालेला आहे, लेखक यातून असे सुचित करतो की साधन संपत्ती, ऐश्वर्य या मानसिक कल्पना आहेत.  प्रत्येकाची दुःखाची व्याख्या ही त्याच्या मनोभूमीवर अवलंबून असते. 

नाकबळी या कथेमध्ये स्त्री-पुरुष नातेसंबंधातील आधुनिक जीवन संघर्ष लेखकाने मांडलेला दिसतो. अंजोर, आशु आणि प्रतीक या तीन पात्रांमध्ये प्रस्तुत कथा मांडलेली आहे. एकमेकांशी असलेले शारीरिक आणि मानसिक संबंध आजच्या आधुनिक काळात विवाहबाह्य ठरत नाहीत. तर त्यांना रिलेशनशिप हे गोंडस नाव देऊन नातेसंबंधातील हळवेपणा, अधिकार, हक्क टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. एकमेकाला समजून घेण्यासाठी रिलेशनशिप या नव्या नात्याचा उगम झालेला दिसतो आणि या नात्याला संपविण्यासाठी अर्थात ब्रेकप या संकल्पनेसाठी सुद्धा फार त्रास होत नाही. स्त्री-पुरुषांच्या दोघांच्या संमतीमुळे या गोष्टी होत असल्यामुळे आधुनिक काळात निर्माण झालेले नवे नातेबंध यामुळे अधिक सुदृढ झाल्याचे दिसतात. प्रत्यक्षात मात्र संस्कृती संरक्षकांची भूमिका ही रिलेशनशिप विरोधात दिसते. लेखक मात्र या संकल्पनेकडे सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहतो.

कथेतील नायिका अंजोर हिच्या आयुष्यात आलेले दोन पुरुष आणि त्यांना समजून घेण्यासाठी तिने स्वीकारलेली रिलेशनशिप यापूरती कथा मर्यादित राहत नाही, तर या कथेतील नायक आशु हा एका वेगळ्या मानसिक आजाराने त्रस्त आहे आणि त्यावर नेमका कोणता उपाय शक्य आहे याविषयी तो अंजोरशी संवाद साधत आहे, असे स्वरूप सुद्धा या कथेला प्राप्त झालेले आहे. स्पर्शसुख आणि वासना याच्यातील सीमारेषा मांडताना आशु केवळ व्यक्तीच्या नाकाला स्पर्श करण्यासाठी इच्छुक आहे, त्याला त्यातून मानसिक, शारीरिक आणि वासनाविषयक आनंद अपेक्षित आहे.  शारीरिक आनंद अर्थात सेक्सुअल प्लेझर ही संकल्पना मांडताना.  बॉर्न इन मॉडर्न टाइम्स म्हणजेच आधुनिक युगात आपण जगत आहोत, तेव्हा आपल्या वासनेच्या कल्पना सुद्धा नव्या असायला हव्यात ही विचारधारा आशूची आहे. शारीरिक आणि अशारिरी प्रेम असा सुद्धा आशय यातून व्यक्त होतो. अंजुरला मात्र आशु हा समलिंगी अर्थात गे या मानसिकतेचा असावा असा संशय येतो. म्हणूनच ती ब्रेकअपचा पर्याय निवडते, परंतु जेव्हा तिला आशुचा मानसिक विचार /समस्या कळते तेव्हा मात्र ती त्याला तिच्या नाकाला स्पर्श करण्याची परवानगी देते. विकृत शारीरिक आकर्षणाचे दमन करणे ही जाणीव या कथेमध्ये मांडण्यात आलेली आहे. परंतु त्याचबरोबर नव्याने निर्माण होणाऱ्या शरीर सुखाच्या कल्पना सुद्धा यात मांडलेल्या दिसतात.

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट ही कथा मराठी साहित्य विश्वासंदर्भात आहे. लेखक लेखन समृद्ध कसा होतो, त्याची लेखन करण्यामागची भूमिका आणि एकूणच त्याचा जीवन व्यवहार याविषयी असलेले आकर्षण या कथेतील नायकाला असल्यामुळे तो त्याच्या समोरील आदर्श लेखकाच्या सोबत राहून स्वतः लेखक बनण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांमध्ये त्याला मिळालेले यश आणि त्याला समजलेले जीवनाशय कथेमध्ये मांडलेले आहेत. चर्चा स्वरूपात ही कथा असल्यामुळे या कथेमध्ये वारंवार निरनिराळ्या विचारांवर खल केलेला दिसतो.

मार्तंड सर आणि भुवन अशी दोन पात्रे यामध्ये प्रामुख्याने दिसतात. मार्तंड सरांची ओळख करून घेऊन भुवन त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त काळ राहण्याचा प्रयत्न करतो. त्यात त्याला असे आढळून येते की मार्तंड सर एकूणच जीवनाकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहत आहेत. स्वतःच्या आजाराकडे पाहण्याची सुद्धा त्यांची भूमिका ही अधिभौतिक स्वरूपाची आहे. जी त्याला पटत नाही, परंतु कालांतराने त्या भूमिकेशी संवादी तो बनलेला दिसतो. एक नवोदित लेखक म्हणून आपल्याला नेमके काय वाचायला हवे, कसे लिहायला हवे ही संस्कारपूरक जाणीव भुवन व्यक्त करतो आहे. महानगरातील निरनिराळ्या प्रश्नांवर या निमित्ताने चर्चा केलेली दिसते. त्यामध्ये दलितजाणीव विषयक भाष्य लेखकाने या पात्रांच्या अनुषंगाने व्यक्त केलेले दिसते. महानगरामध्ये प्रत्येक व्यक्ती धकाधकीचे जीवन जगत असतो, त्याला त्याच्यासमोर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला सामोरे जावे लागते. स्वाभाविकपणे महानगर स्पृश्य अस्पृश्य किंवा बहुजन आणि दलित असा भेद करत नाही. येथे गरीब श्रीमंत हा वर्गवाद आढळून येतो. त्यामुळे महानगरातील दलित जाणीव ही प्रखर, आक्रमक किंवा अन्यायकारक आढळत नाही - असे लेखकाला वाटते. शॅडोईंग अर्थात सावलीमध्ये राहणे ही सुद्धा एक कल्पना येथे व्यक्त झालेली दिसते. महान व्यक्तीच्या सोबत राहिल्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेल्या संस्कार-कल्पना आपल्याला अनुभवता येऊ शकतात असे यामागचे धोरण आढळते.

कथेमध्ये एका ठिकाणी दिनदर्शिकेतील वार आणि त्यांना चिटकवण्यात आलेले देव याविषयी चर्चा केलेली दिसते. कुठल्याही एका देवाला एखाद्या दिवसांमध्ये अडकवता येणे शक्य नाही, असे एकूणच लेखकाचे म्हणणे आहे. परंतु देव ही संकल्पना मान्य करण्याकडेच आपण सर्वप्रथम विचाराधीन असायला हवे असे निवेदक सुचवितो. मार्तंडसरांना मधुमेहाचा त्रास आहे तरीही दारू पिणे, सिगरेट ओढणे आणि आवश्यक तो उपाय न करणे याकडे त्यांचा कल दिसतो. यासंदर्भात चर्चा करताना मार्तंड सर असे सांगतात की माझा मृत्यू अद्याप जवळ आलेला नाही, यासाठी एक गोष्ट ते भुवनला सांगतात. त्यांना ब्रह्मदेवाने साक्षात्कार देऊन असे सुचित केले आहे की जोपर्यंत तुझ्या मेंदूमध्ये नवे विचार, कथेचा नवा प्लॉट येणार तोपर्यंत ती कथा लिहीपर्यंत तू जिवंत राहणार. ज्यावेळेस कथेचा प्लॉट मेंदूच्या पटावर विकसित होणे थांबेल त्यानंतर तुझे मृत्यूपर्व सुरू होईल. हे उपकथानक निवेदकाला जाणीवपूर्वक मांडायचे आहे.  लेखक हा लेखनसामग्रीने पछाडलेला असतो. त्याच्या मेंदूच्या पटावर जेव्हा लेखनसामग्री अस्तित्वात येत नाही त्यावेळेस त्याचा मृत्यू झालेला असतो. कथेचा प्लॉट ही कल्पना सुद्धा भुवनसाठी नवी आहे. याबद्दल चर्चा करत असताना मार्तंड सर जाणीवपूर्वक त्याला निरनिराळ्या पार्श्वभूमीवर अर्थात प्लॉटवर  घेऊन जातात. त्यामध्ये धारावी, देशी बार अशा ठिकाणी त्यांनी प्रवास केलेला दिसतो. खारदांडा, पवई, हातभट्टीची दारू, वडापाव अशा मुंबईतील महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली जाते आणि त्याबद्दलची मते मांडली जातात. वास्तववाद या संकल्पनेतील वाद आणि वडा या मध्ये असलेला स्पेलिंगचा साम्य भाव मार्तंड सर उलगडून दाखवतात.

देव ही प्रतिमा ही मायाळू की मायावी याबद्दलही चर्चा केली जाते. ब्रह्मदेवाचा करार आणि औषधोपचार याविषयीचे मार्तंड सरांचे मत हे मायावी नसून मायाळू आहे असेच वाटत राहते. मुंबई महानगरामध्ये किंबहुना एकूणच सर्वच जीवनरहाटीमध्ये ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आपल्याला आढळून येतो. मार्तंड सर भुवनला जाणीवपूर्वक या वादाच्या मधल्या पट्टीमध्ये, मधल्या स्थितीमध्ये राहणे सोयीची असल्याचे सांगतात. आपला मुक्काम हा सांस्कृतिक फटीमध्ये असायला हवा, तो कुठल्याही एका विचाराचा झेंडा फडकवणारा नसावा, अशी जाणीव यातून व्यक्त केलेली दिसते. जोपर्यंत आपण वर्णवाद वर्चस्ववाद यापासून दूर जात वर्गवाद समजून घेत नाही तोपर्यंत वर्ग कहाण्या अर्थात मर्म कहाण्या आपल्या लेखनामध्ये येणार नाहीत असे मार्तंड सर भुवनला सुचित करतात.


संशय कल्लोळात राशोमान या कथेमध्ये लेखकाने नाट्य क्षेत्राशी संबंधित काही घटना मांडलेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर मानवी नातेसंबंध आणि मनामध्ये निर्माण होणारा संशय याविषयीचे मानसिक विश्व साकारलेले आहे. या कथेतील नायक हा लेखक असून नाटकाचे लेखन केल्यानंतर तो नाटक सादरीकरण केल्या जाणाऱ्या विविध ठिकाणी नाटक कंपनीसोबत जाणे पसंत करतो. यादरम्यान त्याला काही घटनांना सामोरे जावे लागते. परंतु त्या घटनांमधील त्याचे अस्तित्व हे केवळ दर्शकापुरते मर्यादित असते. तरीही त्याच्या साक्षीला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्याच्यामुळेच संबंधित व्यक्तीच्या रोशास तो पात्र होतो आणि त्या व्यक्तीकडून धमकीचे फोन येऊ लागतात. आपल्याला नेमका धमकीचा फोन कोण करीत आहे याबद्दल नक्की माहीत नसल्यामुळे नायकाच्या मनात संशयाचा कल्लोळ उभा राहतो. यावर उपाय म्हणून तो ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्यापर्यंत आपण पोलीस तक्रार करीत आहोत अशी बातमी पोहोचवतो. त्यामुळे त्याला फोन येणे बंद होते. इतक्या घटनांपूर्तीच ही कथा मर्यादित असली तरी प्रत्यक्षात मनामध्ये निर्माण होणारा संशय आणि त्या मुळे आपल्या जीवनपटामध्ये होणारा बदल याविषयी शब्दचित्र रेखाटलेले दिसते. भित्यापाठी ब्रह्मराक्षस असे जे म्हटले जाते त्याचे प्रत्यय कथेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे

  कथेचा केंद्रवर्ती नायक हा अजातशत्रू स्वभावाचा आहे. असा उल्लेख येतो. अर्थात ज्याचा कोणी शत्रू असू शकत नाही असे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्वाभाविकपणे त्याला जेव्हा धमकीचे फोन येऊ लागतात तेव्हा आपला नेमका शत्रू कोण हे त्याला कळत नाही. परंतु मागील काही वर्षभरातील घटनाक्रम विचार केल्यानंतर त्याला असे आढळून येते की आपल्याला फोन करणारा व्यक्ती हा तोच असावा ज्याला आपल्या साक्षीमुळे आपल्या नाटकातून काढून टाकलेले आहे. त्याचे हे भाकित खरे ठरते आणि धमकीचे फोन देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडे तक्रार केल्याचे समजल्यावर तो फोन करण्याचे बंद करतो. एकूणच नाट्य क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल येथे काही संकल्पना मांडण्यात आलेले आहेत. यामध्ये एकत्र राहणे, काम मिळण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करणे, दोन पुरुषांचे एकमेकांशी असलेले शारीरिक संबंध अशा प्रकारच्या घटकांची चर्चा केलेली आढळते.

‘पाण्यात राहून माशाशी  वैर घेऊ नये’ किंवा ‘पाण्यातील लोणी’ अशा प्रकारच्या भाषिक रचना करून लेखकाने या कथेतील आशयाला प्रभावी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. संशय मनामध्ये निर्माण होत असतो ती सुद्धा एक महत्त्वाची आणि स्वाभाविक प्रक्रिया असते. हत्ती आणि सात आंधळे याचे उदाहरण या संदर्भात महत्त्वाचे दिसते. प्रत्येक आंधळ्याला हत्तीच्या अवयवांचे ज्ञान होते परंतु संपूर्ण हत्ती कधीच समजून येत नाही. प्रत्येकाची मर्यादा ही त्याच्या जीवनाचा आशय किंवा त्याला दिसणाऱ्या घटनांमधील सत्य-असत्य जाणीव समजून घेण्यासाठी मदत करीत असतात. परिपूर्ण सत्य किंवा परिपूर्ण असत्य अशी कुठली गोष्ट त्यामुळेच अस्तित्वात येऊ शकत नाही. लेखकाने या सर्व गोष्टींचा परामर्श  घेतलेला दिसतो. पाप भित्र असतं असे विधान या कथेमध्ये मांडून लेखकाने संशय कल्लोळात राशोमान याची भाष्य स्वरूपात जाणीव व्यक्त केलेली दिसते. 

What is there in name? या प्रश्नविधाना पासून सुरुवात झालेली रावण आडनावाच्या पांडवपुत्र्याच्या नावाची जन्मकथा  ही कथा नाव-आडनाव या  संज्ञेचा विचार मांडत  मानवी नातेसंबंध, पुराण कथा, धर्मशास्त्र आणि  शैक्षणिक क्षेत्रातील सेमिनार या कार्यप्रणालीवर भाष्य करते.   मल्हारी पांडव रावण या नावाच्या माणसाबद्दल त्याच्या एकूणच नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव याबद्दल कुतूहल निर्माण झाल्यामुळे कथेचा निवेदक त्याच्या या संपूर्ण नावाविषयी आश्चर्य व्यक्त करतो. आणि त्याच्याशी संवाद साधून त्याच्या नावामागचे रहस्य जाणून घेतो.   मल्हारी पांडव रावण हे पात्र सुदधा आपल्या नावामागचे रहस्य दीर्घकथेच्या माध्यमातून सांगते.   ही कथा सुद्धा  काल्पनिक, अतिशयोक्तीपूर्ण आहे.   कथेचे हे आशयसूत्र असले तरी प्रत्यक्षात ही घटना महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या सेमिनारमध्ये घडते, यातून लेखकाला सेमिनारमध्ये घडणाऱ्या चर्चासत्रांचे आणि अभ्यासाव्यतिरिक्त होणाऱ्या चर्चेची चर्चा करायची आहे, असे दिसून येते.  आपल्या पदाच्या उन्नतीकरिता गुण गोळा करण्यासाठी प्राध्यापक मंडळी चर्चासत्रात उपस्थित राहणे, अभ्यासपत्र सादर करणे इत्यादी गोष्टी करीत असतात.  या अभ्यास व्यवहारात नेमका गुणात्मक अभ्यास होत असतो का?  की केवळ गावगप्पा होतात!  याविषयी निवेदक भाष्य करतो. 

 ‘भटक्या जनजाती आणि जागतिकीकरण’ असा विषय चर्चासत्रांमध्ये मांडला जातो, परंतु प्रत्यक्षात यामध्ये खरोखर भटक्या विमुक्त जमातींसाठी काही ठोस उपाय योजना निर्माण होण्याच्या शक्यता असतात का?  की केवळ कागदी घोडे नाचवणे या व्यतिरिक्त या सेमिनारमधून काही मूल्यात्मक गोष्टी निर्माण होतच नाहीत.  असे भाष्य नोंदविताना निवेदकाने सेमिनारला प्रपंच असे म्हटले आहे.  मल्हारी पांडव रावण आपल्या नावाचे रहस्य सांगत असताना तो समाजातील निरनिराळ्या घटकांवर चर्चात्मक भाष्य करतो.  कथेचा निवेदक आणि मल्हारी पांडव रावण यांच्यातील संवादातून आपल्याला धर्मविषयक काही चिकित्सात्मक विधाने आढळून येतात.  कुंभमेळा, आखाडे, नशापाणी या मुद्द्यांच्या आधारे साधूंच्या हातात असलेल्या हत्यारंविषयी सुद्धा या कथेमध्ये चर्चात्मक सूर आढळून येतो.  धर्माच्या भिंगातून पाहण्याची सर्वसामान्यांची भूमिका बदलायला हवी असे निवेदकाचे चिंतन आढळते. 

 मल्हारी आपल्या नावाची रहस्यकथा सांगताना कथेचा उल्लेख तांड्याची गोष्ट असा करतो, कारण या कथेतील मुख्य पात्र दामूशेठ हा श्रीमंत गृहस्थ आहे, अतिरिक्त पैसा असल्यामुळे पैशाबद्दल विरक्ती आलेल्या दामू शेठ आपल्या तीन मित्रांना सोबत घेऊन गृहत्यागाची कल्पना मांडतो, त्याला सर्वजण सहकार्य करतात.  एकत्र प्रवास करतात. या तांड्यामध्ये पैशाची ददात नसते, त्यामुळे स्वाभाविकच एका जागी स्थिर न राहण्याचा त्यांना फायदाच होतो.. त्यात यमी नावाची वेश्या सुद्धा त्यात सामील होते आणि तिच्या सोबत तिचे संरक्षण करणारा तिचा सोबती सुद्धा - अशाप्रकारे  एकूणच पाच पुरुष आणि एक स्त्री यांचा हा प्रवास कुठेतरी संपायला हवा, अशा एका स्थिर घटकापाशी कथा येऊन थांबते.  हे स्थिर घटक म्हणून एका देवळाचा उल्लेख केलेला आहे.  या देवळापाशी या सर्वांना समजते की हे रावणाचे देऊळ आहे.. यमीच्या पोटात वाढणाऱ्या मुलाचे नाव मल्हारी असायला हवे, स्वाभाविकपणे वडिलांचे नाव पांडव आणि आडनाव रावण असणे यातून सूचित होते. 

 मल्हारीने सांगितलेली कथा ही कपोलकल्पित आहे, परंतु या कथेदरम्यान काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवेदकाने प्रकाश टाकलेला दिसतो.  विशेषतः गृहत्याग ही कविकल्पना वाटत असली तरी, अशाप्रकारे स्वतःचे घर सोडून फिरणारी, ज्याच्यापाशी गडगंज पैसा आहे आणि ज्यांना संसाराची विरक्ती आलेली आहे अशी अमेरिकेतही हिप्पी नावाची समूहप्रेरणा आढळून येते.   स्वच्छंदी, निर्हेतुक, दिशाहीन फिरणे सुद्धा कठीण असते.  असाही उल्लेख यांच्या अनुभवातून मांडलेला आहे.   अशा प्रवासात दारू आणि पारू सुद्धा हवी ही अपेक्षा त्यांच्याकडे असलेला पैसा पूर्ण करतो.  त्यामुळे त्यांच्या प्रवासात निरनिराळ्या स्त्रिया त्यांना शरीरसुखासाठी मिळतात.  परंतु एका ठिकाणी यमी  जिला कालांतराने ते सखी असे संबोधतात, ती येते.   तिच्या संवादातून वेश्‍या व्यवसायात असलेल्या स्त्रियांच्या व्यथा-वेदनांबद्दल भाष्य केलेले आहे.  तिच्यासोबत असलेला पुरुष जो निरनिराळ्या प्रकरणात मानवी हत्या प्रकरणात गुंतलेला आहे.  तोसुद्धा ग्रामीण भागातील हत्या आणि आत्महत्या यावर चिंतन व्यक्त करतो वेश्याव्यवसायात कौरवांची द्रोपदी होण्यापेक्षा पांडवांची द्रोपदी झालेली चांगली असे म्हणणारी यमी एकूणच वेश्या जीवनाची दाहकता मांडताना दिसते. 

एकंदर सतीश तांबे यांच्या कथांमधून आधुनिक कालखंडातील विशेषत: सायबर विश्वातील मानवी नातेसंबंध, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराविषयी चर्चा केलेली आढळते.  या बदलामुळे तयार झालेले नवे संस्कार, मानवी मुल्यांची झालेली पडझड आणि विकास, भ्रष्टाचार आणि आधुनिक शिष्टाचार  अशा विविधांगी मतमतांतराची मांडणी केलेली दिसते.  कथेचा यथोचित वापर केल्यामुळे कथा या साहित्यप्रकाराचे मूलभूत सौदर्य टिकवून सतीश तांबे सामाजिक आशय मांडतात. 




(सदर लेखन शैक्षणिक वर्ष २०२२ च्या मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांकरीता अभ्यासासाठी तयार केलेले आहे.)



आदित्य अंकुश देसाई

दिनाक- २३ सप्टेंबर २०२२

भाद्रपद कृ १३, शके १९४४

 



Wednesday, September 21, 2022

मोबाईलच्या वळणावर.....

 




        वेग वळणावर कमी करायचा असतो हे जेव्हा दुचाकी चालवायला शिकलो तेव्हा कळलं,  वेग हायवेवर सक्तीने वाढवावाच लागतो हे सुध्दा हायवेवर जबरदस्तीनेच शिरलो तेव्हा कळलं.  वेगात अचानक ब्रेक दाबायचा नसतो हे मात्र न शिकवताही समजून गेलो.  वेगावर नियंत्रण हवे पण ते कोणाचे हे मात्र शिकता आले नाही.  कारण वळण जेव्हा दिसू लागते तेव्हा टू व्हिलरच्या एक्सीलेटरवरचा हात आपोआप खाली होतो.  हायवेवर जेव्हा इतर गाडयांचा वेग वाढू लागतो तेव्हा आपल्या गाडीने कधी सत्तरच्याहीवर वेग नेऊन ठेवलाय हे कळायलाही मार्ग नसतो.  रेल्वेच्या दारात उभे राहून हवा खाताना समोरुन येणारी गाडी किंवा खांब दिसला की सर्व जण आपोआप आत येतात आणि दहीहंडीवरुन पडणाऱ्याला छेलण्यासाठी सर्वाचे हात आपोआप वर जातात.  

खूप विचार केला की हे असं का होतं.  सकारात्मक आणि नकारात्मक कारणे डोक्यात येरझाऱ्या घालू लागली आणि कधी नव्हे ते नकारात्मक विचारांचा विजय झाला आणि घरचा रस्ता जवळ येईपर्यत गाडीच्या वेगाबरोबर माझ्या मनातल्या विचारांनी नकाराचा हाॅर्न वाजवायला सुरुवात केली.  वळणावर वेग आपोआप कमी होतो कारण आपण मरणाला भितो....  सर्वच वेग विषयक प्रश्नांची उत्तरे आपण भितो अशीच येऊ लागली आणि गाडी एका आडोश्याला आपोआप उभी राहीली.  माझं हे अस असतं.  चालत्या गाडीवर विचारांची चक्र व्यवस्थित फिरत नाहीत.  त्यासाठी एक तर पाय चालायला हवेत किंवा एका स्थिर जागी डोक... गाडी रस्त्यावर उभी करुन घरी चालत जाणं मूर्खपणाचं असल्यामुळे थोडावेळ थांबू नि निघू हा निर्णय झाला आणि पुन्हा हाॅर्न वाजला. 

शहराची व्यवस्था माणसाला भित्रे बनवते.  पलायनवादी वृत्ती अंगात इतकी भिनवली जाते, की प्रत्येक क्षणापासून शहरातला माणूस सोईस्कररित्या स्वतःला सोडवून घेतो आणि पुन्हा व्यवस्थेला दोष दयायला तयार होतो.  आपल्याकडून काही होणार नाही पण लोकांनी केलेच पाहिजे हा अटटाहास असल्याने या शहराचे काहीच होण्यासारखे नाही.  इथला प्रत्येक माणूस वळणावर वेग कमी करणारा आहे.  सुसाट पिसाट ही वृत्ती तरुणांना शोभते मात्र हेच तरुण जेव्हा तारुण्याचा अरुण पार करतात तेव्हा त्यांचा अरुणास्त आस्ते आस्ते होताना दिसतो.  हेच तरुण मग वळणा वळणावर आपल्या भूतकाळाच्या वेगाचे गोडवे गाताना दिसतात आणि नव्या पिढीच्या वळणावर होणाऱ्या अपघातांबददल दोष देत राहतात.


        आमची पिढी अशी नव्हती हे वाक्य प्रत्येक पिढी नव्या पिढीला ऐकवताना दिसते.  तुमचं आमच सेम असतं म्हणणारेही आजकाल सेम या षब्दातील षेम किंवा क्षेम तपासताना दिसतात.  कारण आजच्या पिढीची वळणच जाम भारी झालीत, किंवा ही पिढी वळणावरच संसार करतेय असा भास निर्माण झालाय.  वेगापेक्षा वेगावरचा सेल्फी त्यांना महत्वाचा वाटतोय आणि म्हणूनच प्रत्येक वळणावर सेल्फी घेत ही पिढी मार्गक्रमण करीत चालली आहे.  पांडुरंगाचे वेड लागलेेले वारकरी आणि मोबाईलच्या महाजालात अडकलेला माॅबाईलधारी यांच्यात फरक तो कोणता?

आता मात्र गाडीच्या बटनस्टार्ट बटनावर बोट दाबलं गेल नि गाडी पुन्हा घराच्या दिशेने सुरु झाली.  पुन्हा माझा वेग माझ्या दुचाकीने धारण केला आणि बाईनं शांतपणाने मला घरापर्यत आणून सोडलं.  शांतपणानं म्हणजे त्या तेवढया प्रवासात माझ्या डोक्यात कोणताच विचार आल्याचे मला स्मरत नाही, आणि जेव्हा नेमके काय हे स्मरत नसते तेव्हा नेमके असे काहीच नसते.  कारण त्या जवळजवळ अर्धा किलोमिटरच्या प्रवासात आलेले आठ ते दहा स्पिडब्रेकर आणि माणसांचे लोढे, फेरीवाले, मित्रांचे हातवारे आणि त्या साऱ्यांना सलामी देणारा माझा हाॅर्न यात विचार काय करणार.... चहाचा घोट घशाखाली उतरला आणि पुन्हा विचारचक्र ....  वेग आणि वेड यांचे नाते जीवनात हवे की नको आणि हवेच असेल तर त्याचे रुप नेमके कसे हवे. ??? 

महाविदयालयातील प्राध्यापक आणि प्रभारी प्राचार्य या पदावर काम करीत असताना मला विदयापीठाचे नियम आणि स्थानिक विदयार्थ्यांच्या जीवनाशी संवाद साधणारे नियम यांच्यातील झगडा नेहमीच दिसत आलेला आहे.  वेग आणि वेड यांचा विचार केवळ तरुण पिढीपुरता करायाचा झाल्यास आपल्याला या तरुणांच्या वयाची व्याख्या निश्चित करावी लागेल.  कारण पूर्वी वहीच्या पाठच्या पानावर संदेश लिहून किंवा वहीची पाने फाडून त्याची चिठठी करुन वर्गातल्या वर्गात संदेश पाठवणारी प्रियकर प्रेयसी त्यावेळी तरुणच होती आणि आज व्हाॅटसपवर संदेशन करणारी पिढीही तरुणच आहे.  आम्ही असे नव्हतो म्हणणाऱ्या पिढीला आजच्या पिढीसारखे होण्यासाठीची साधनेच तेव्हा उपलब्ध नव्हती त्यामुळे स्वाभाविकच आम्ही असे होऊच शकत नव्हतो... असे बोलणे चूकीचे ठरते.  प्रत्येक पिढी आपल्या सभोवतालच्या विश्वावर आरुढ होत असते.  त्यांना मिळणाऱ्या साधनांचा अनिर्बंध वापर करीत असते.  केवळ रेडियो ऐकणाऱ्या पिढीला टिव्हीचा आणि टिव्हीवाल्या पिढीला संगणकाचा आणि आजच्या युगात आम्हा संगणकवाल्या पिढीला स्मार्ट फोनचा राग येतो.  कारण नवी पिढी नेहमी एक पाऊल पुढे असते. 

झाडाच्या मागे लपून प्रियकर प्रेयसी नेमके काय करत होते ते आम्हाला फार उशीरा कळलं.  त्यामुळे आमच्या पिढीपाशी झाड होती, प्रेयसी होती पण नेमका कार्यक्रम काय असतो तेच माहीत नसल्याने केवळ गप्पाच्या मैफिली झडल्या पण आजच्या पाॅर्न साइटवर निर्ढावलेल्या डोळयांनी रेंगाळणाऱ्या पिढीला नेमका कार्यक्रम माहीत आहे. त्यांच्यापाशी प्रियकर आणि प्रेयसीसुध्दा आहे.  उपलब्ध संधीचा फायदा म्हणा किंवा गैरफायदा म्हणा घ्यायला ही नवी पिढी तत्पर आहे.  असे असूनही संस्कृतीसुध्दा शाबूत आहे कारण या पिढीने मुळात एक नवे ब्रीद तयार केलेले आहे.  आवडला तर फाॅर्वड नाहीतर डिलिट... या नव्या संस्कृतीतल्या पिढीला गाडी कोणत्या वळणावर कशी हळू चालवायची आणि कधी वेग घ्यायचा हे आपसूक कळलेले आहे.

एकीकडे लैगिंक शिक्षणाचे धडे देण्यासाठी लाजणारे शिक्षक आणि दुसरीकडे लैगिक शिक्षणाचे निरनिराळया मिडियाच्या रुपाने गर्भाशयातूनच शिक्षण घेऊन आलेली थ्रिजी, फोरजीची पिढी यांच्यामध्ये काळानुसार सरस कोण हा प्रश्न निर्माण होतो. ही फोरजीची पिढी ताटातली कारल्याची भाजी खात नाही.  तिला पिझा बरर्गर हवा. हा प्रश्न आणखी वेगळा आहे.  खादय संस्कृतीतही होणारा बदल येथे नक्कीच चिंतनीय आहे.  पण अशा प्रकारचे मुक्त चिंतन करण्यासाठी पुन्हा गरम चहाचा घोट हवा.


टिव्हीवरच्या जाहिराती सुरु झाल्या की आपोआप रिमोट हातात येतो आणि टिव्ही म्युट केला जातो.  हे सुध्दा आपसूकच होते.  पुन्हा टिव्हीचा आवाज कधी वाढवायचा हे सांगायला घरातली आई लक्ष देत असते.  ही सुध्दा जर फोरजीवाली असेल तर ती सुध्दा हा मधला वेळ वाया घालवत नाही.  तिचा सुध्दा वाॅटसप आॅनलाईन होतो.  या वाॅटसपवाल्या आई जेव्हा आजी होतील तेव्हाची तरुण पिढी वाॅटसपच्याही पल्ल्याड कुठल्यातरी अवस्थेत सेल्फीपेक्षाही वेगळ काहीतरी शोधत असेल किंवा साधत असेल.  

शतपावली एकाचीच असावी या मताचा मी आहे कारण या निमित्ताने पुन्हा स्वतःशीच संवाद साधता येतो.  पाय सुरु झाले की विचारांचे हाॅर्न वाजू लागतात. एकूणच पिढीतील अंतराचे निरिक्षण नोंदवणे आणि त्यांची उकल करणे हा आजचा विषय मी धरुन ठेवलाय. कारण जेवतानाही मला जाणवत होत की जेवणावळी डायनिंगटेबलवरुन  दररोज उठतात पण वदनी कवळ घेता किंवा हरीच्या घरी शेवया तूप लाडू सारखे श्लोक आजकाल कोणत्याच घरात गर्जत नाहीत किंबहुना संध्याकाळच्या शुभंकरोतीच्या वेळी मुले एक तर बेबी सिटींगमध्ये असतात किंवा अभ्यासाच्या जात्याला बांधलेली असतात.  या पिढीचा वेळ किती वाया जातोय असे म्हणण्यापेक्षा किती कारणी लागतोय हेच महत्वाचे ठरतेय.  


समाजभान लवकरच जागृत करणारी ही पिढी आहे, कारण एकाच वेळी कितीतरी सत्ताकेंद्रांना यांना सामोरे जावे लागते.  आई, बाबा, आजी, आजोबा, स्कूलबसची ताई, दादा, लिडर, शाळेतल्या बाई, माॅनिटर, क्लासच्या टिचर, बेबीसिटींगमधली माई, तिथला दादा किंवा ताई, मैदानातल्या मित्रांमधला बाॅस, शाळेतल्या मित्रांमधला शत्रू या सर्वंच सत्ताकंेद्राशी संभाळून वागताना ही पिढी कमालीची आश्वासक आणि तटस्थ झालेली दिसते.  या साऱ्या गर्दीमध्ये आपले कोणीच नाही याची जाणीव त्यांना फार लवकरच येते म्हणूनच या पिढीला सेल्फी काढावासा वाटतो.

सेल्फी हा रोग नसून ते एक औषध आहे.  एका वळणावर सापडलेले, एका वळणावर वेग कमी करणारे कारण हा वेग कमी झाला तरच वळण संपल्यावर पुन्हा वेग घेता येईल.  शतपावली संपताना एका चांगल्या मुदयापाशी थांबण फार चांगलं असतं कारण तरच चांगली झोप येते.  असं मीच म्हणत असतो.  त्यामुळे सेल्फी पिढीचा नकारात्मक विचार करताना तिचा सकारात्मक संदर्भ मनात येतोय हे सुध्दा चांगलेपणाचेच द्योतक म्हणावे लागेल.  महाविद्यालयीन विदयार्थ्याचे घोळके मी सध्या पहातोय.  त्यांच्यातील मैत्रीची बदलणारी व्याख्याही तपासतोय.  जीवाला जीव देणारी पिढी आज दिसत नाही हे ही तितकेच खरे आहे.  कारण जो तो एकलकोंडा बनलेला आहे.  एकाच महाविदयालयापुरते हे गृप मर्यादित नाहीत.  एकाच वेळी काॅलेज कटटयावर तिन ते चार महाविदयालयाची मुले वाॅटसपवर चॅटिंग करत एकत्र येतात. मेंटली एकत्र फिजिकली दूर ही अवस्था अनुभवतात.  

मॅग्डीच हवे असा यांचा अटटाहास नसतो.  कधी बसस्टाॅप कधी गार्डन तर कधी काॅलेजच्या पायऱ्या सुध्दा यांना चालतात.  प्रोफेशनली ही मुले एकाग्र असतात आणि सोशली नेटकरी त्यामुळे त्यांना आपल्या भवितव्याकडे गंभिरपणे पाहता येते.  पाॅर्नसाईटचे अॅडिक्ट तर टक्केवारीच्या भाषेत सांगायचे तर ८० टक्के विदयार्थी असतात. पण त्यांचे पासवर्डच्या  प्रतिकात्मक पध्दतीचे असतात.  पण हा सुध्दा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वपूर्ण भाग असतो.  मोबाईल जप्त केल्यानंतर पासवर्ड न सांगणारी जी मुले असतात.  त्यांना लाज वाटत असते पण ती सुध्दा प्राध्यापकांविषयी असलेल्या आदरयुक्त भितीची... अन्यथा या साईटस त्यांच्यासाठी एक वैयक्तिक विषय असतो.

अशा साईटस सोशली म्हणजेच समूहाने पाहणारीही मुले होती जेव्हा मोबाईल एकाकडेच असायचा आणि इतर त्यात डोकावायचे... आता हातातल्या घडयाळाप्रमाणे मोबाईल महत्वाचा आणि तितकाच वैयक्तिक बनल्यामुळे टाईम्स आॅफ इंडियाचे अॅपस जसे मोबाईलमध्ये सेव असते तसेच काही पाॅर्नसाईट मुलांच्या मोबाईलमध्ये सहजपणे आढळतात.  काही वर्षापूर्वी विदयार्थी आणि विदयार्थीनी हा भेद करुन न्यायदानाची पध्दत प्राचार्य किंवा प्राध्यापक कक्षात योजली जात असे.  पण आजकाल विदयार्थीनीही पाॅर्नसाईटच्या बाबतीत मुलांच्या बरोबरीनेच किंबहुना अधिक जागृकपणे सावधपणे आस्वाद घेताना आढळतात.  मोबाईलच्या वळणावर ही पिढी थोडी रेंगाळली आहे खरी पण त्यांना याचे धोके आपोआप कळले आहेत.  जगण्यावर प्रेम करताना, स्वतःवर प्रेम करताना या पिढीमध्ये स्त्री पुरुष नातेसंबंधाबाबतची गणिते बदललेली आहेत.  

सहजपणे हस्तांदोलन किंवा एकमेकांस मिठी मारणे, खांदयावर हात ठेवून उभे राहणे, सेल्फी काढताना गालाला गाल लावणे या गोष्टी सहज बनल्या आहेत.  जुन्या पिढीचे डोळे पांढरे होतील अशा प्रकारचे हातवारे जेव्हा मुली करतात किंवा आई बहिणींवरुन नेमक्या टोनमध्ये शिव्या देतात तेव्हा जाणवते की स्त्री स्वातंत्र्यावर गप्पा मारणाऱ्यांनी या घटकाचा सकारात्मक विचार करावा.  हे स्वातंत्र्यही तितकेच आवश्यक आहे.  मोबाईलच्या जगात अजून खूप वळणे येणे बाकी आहे.  प्रत्येक पिढी अशा वळणावर थोडी मंदावते.  वेगानेसुध्दा आणि मनानेसुध्दा... त्यांच्या मंदपणाचा विचार करायला हवा.  त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या हातातल्या साधनांचा सकारात्मक सांधा जुळवायला हवा. 



प्रा आदित्य अंकुश देसाई
दिनाक २१ सप्टेंबर २०२२
भाद्रपद कृ ११ , इंदिरा एकादशी

Wednesday, September 14, 2022

बकऱ्याची बॉडी

    


बकऱ्याची बॉडी - समर खडस


    समर खडस हे आधुनिक कालखंडातील मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. उत्तर आधुनिकतावाद ही संज्ञा समजून घेताना समर खडस या लेखकाचा शैलीचा अभ्यास करावा लागतो.  समर खडस हे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक असून ते राजकीय ब्युरोचे प्रमुख आहेत. गेली अनेक वर्ष राजकीय पत्रकारिता करणारे समर खडस हे कथालेखक असून त्यांचा ‘बकऱ्याची बॉडी’ हा कथासंग्रह देखील प्रसिद्ध झालेला आहे. 'ख' या ब्लॉगच्या माध्यमातून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यातील राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींवर भाष्य करतात. ‘बकऱ्याची बॉडी’ या कथासंग्रहामध्ये एकूण आठ कथांचा समावेश केलेला असून या कथा 'वसा', 'आजचा चार्वाक', 'पर्याय', 'मौज', 'शब्दालय' या दिवाळी अंकांमधून १९९५ ते २००७ या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यामुळे ८० च्या दशकात शेवटच्या कालखंडात आणि २००० च्या जवळपास सगळ्याच कालखंडामधील या कथा आहेत. आपल्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये ते असे लिहितात की'  "या काळ्याशाईची नशा येऊ देऊ नकोस" हे वाक्य त्यांच्या वडिलांनी उद्गारलेले होते, आपल्या लेखनवृत्तीबद्दल वडील सजग आहेत. ही जाणीव त्यांना महत्वाची वाटते.. भाऊ पाध्ये आणि हेमिंग्वे या लेखकांचा त्यांच्यावर विशिष्ट प्रभाव असल्याचे त्यांनी नमूद केलेले दिसते.

भाऊ पाध्ये यांचे लेखन महानगरी जीवनाचा मतितार्थ मांडणारे आहे. विशेषतः महानगरीय माणसांच्या सामाजिक सांस्कृतिक आणि कौटुंबिक समस्यांचा विचार करताना ते दिसतात. अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी आणि गर्दी या शहरातील प्राथमिक समस्या आणि त्याविषयीची सामान्य माणसाची होणारी परवड भाऊ पाध्ये आपल्या कादंबरी लेखनातून मांडतात. समर खडस यांच्या मते भाऊ पाध्ये यांच्या लेखनाचा आदर्श महत्त्वाचा ठरतो. ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी साहित्यामध्ये भाऊ पाध्ये लेखन करीत होते तसेच लेखन अर्निष्ट हेमिंगवे अमेरीकेत करीत होते. या दोघांच्या लेखनशैलीच्या प्रभावात आपण असल्याचे लेखक मान्य करतात. प्रस्तावनेमध्ये त्यांनी मार्क्सवादी, विद्रोही विचारांचा उल्लेख केलेला दिसतो. मार्क्स या विचारवंताने शेतकरी, कामगार आणि कष्टकरी लोकांच्या श्रमाच्या मोबदल्याविषयी भाष्य केलेले आहे. एखादी विशिष्ट व्यवस्था निर्माण होत असताना समाजातील निरनिराळ्या घटकांचा प्रभाव पडत असतो. विशेषतः भांडवलदार उद्योगपती व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी व्यवस्था निर्माण करीत असतात. ही व्यवस्था स्वाभाविकपणे त्यांच्या फायद्याची असते. मार्क्स म्हणूनच विद्रोहाचे धोरण स्वीकारतो. समर खडस यांना ही विद्रोही भूमिका जवळची वाटते.  मुंबई महानगरामध्ये विद्रोह शक्य होत नाही, कारण प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढायची असते. समर खडस आपल्या कथेतून महानगरातील वास्तवाचे शब्दचित्र रेखाटतात. 

लेखक आपल्या लेखनाविषयी भूमिका स्पष्ट करताना ‘आजचा चार्वाक’ या प्रकाशन संस्थेचा उल्लेख करतात, यानिमित्ताने आपल्याला चार्वाक या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती घ्यावी लागते. चार्वाक हे रामायणातील एक पात्र असून आदिवासी असलेल्या चार्वाकने साधना करून एक नवा विचार लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. पूर्वजन्म, पूर्वसंचित, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक या भ्रामक कल्पना असून पुढचा जन्म असे काही नसते. त्यामुळे जो जन्म आपल्याला मिळालेला आहे त्या जन्माचेच आपल्याला चांगले-वाईट, यश-अपयश यांचे अनुभव घ्यायचे आहेत. हा जन्म एकदा संपला की पुन्हा मिळणार नाही. अशा विचार मांडणारा चार्वाक समकालीन वैदिक परंपरेला नकोसा होता. लेखक समर खडस यांना आजच्या काळात चार्वाक या व्यक्तिमत्त्वाचे धोरण महत्त्वाचे वाटते. त्यातून लेखकाचा धर्मविषयक विद्रोह आढळून येतो. 

लेखक समर खडस यांची कथा प्रतिनिधी स्वरूपाची असून महानगरातील गरीब मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय गटातील माणसांच्या व्यथा, वेदना मांडणारी आहे. विशेषतः महानगरात रोजीरोटीसाठी आलेला निरनिराळ्या प्रांतातील जाती जमाती, धर्मपंथाचा माणूस महानगरात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो, परंतु महानगर आक्रमकपणे या माणसांना चिरडून टाकते, माणसांचे माणूसपण हरण्याचा अनुभव महानगरात येतो. जातीय तेढ, धार्मिक दंगली, बेरोजगारी आणि गर्दी यामुळे सर्वसामान्य माणूस स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो.  

याचप्रमाणे महानगरातील मुस्लिम समाजाच्या माथी मारले गेलेले दहशतवादी असल्याचे शिक्के त्यांना सतत त्रस्त करीत राहतात, तसेच मुस्लिम समाजाच्या अंतर्गत असलेल्या सामाजिक प्रश्नांविषयी भाष्य करण्याची कोणी हिंमत करत नाही, अशा प्रश्नांबद्दल लेखक आपल्या कथेतून व्यक्त होतात. लेखकाची दृष्टी ही अभ्यासक, चिंतनशील आणि समाजप्रबोधनाची अपेक्षा असलेली आहे. वास्तव परिस्थितीचे नेमकेपणाने चित्रण करीत वाचकाला ज्ञात नसलेल्या गोष्टींचे ज्ञान करून देणे. चर्चात्मक पद्धतीने दोन पात्रांमधील संवादाच्या माध्यमातून नैतिक-अनैतिक, भ्रष्ट-आर्थिक, सांस्कृतिक घटनांचा लेखक परामर्श घेतो. त्यामुळे लेखकाची कथा अस्तित्ववाद, वास्तववाद, सामाजिक वैचारिक अशा सर्व घटकांना सामावून घेताना दिसते.

समर खडस यांच्या ‘बकऱ्याची बॉडी’ या कथेमध्ये मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि मुस्लिम समाजाची पाहण्याची दृष्टी मांडलेली आहे.. या कथेतील पोलीस पात्र जाधव आणि खान म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम आहेत. नसीम कुलकर्णी या पात्राच्या मृतदेहातला नष्ट करण्याचे काम त्यांना करायचे आहे. त्यासाठी ते मुंबईबाहेर निर्जन ठिकाणी नसीम कुलकर्णीच्या मृतदेहाला घेऊन जात आहेत. मृतदेह उलटा करून टांगणे आणि जाळणे हे काम त्यांच्यावर सोपवलेले आहे.  नसीम कुलकर्णीला बकरा या नावाने संबोधण्यात आलेले आहे.  ही कथा नशीब कुलकर्णीच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकते आणि एकूणच मुंबईतील कुर्ला या उपनगरात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या दैनंदिन जीवन व्यवहारावर समर खडस यांनी भाष्य केलेले आहे. भारतीय मुस्लिम समाजाकडे पाहण्याचे जी दृष्टी इथल्या राजकीय पक्षांनी स्वतःच्या फायद्यासाठी करून ठेवली आहे त्यामुळे सर्वत्र मुस्लिम समाजाकडे संशयाच्या नजरेने पाहण्यात येते, या कथेच्या अनुषंगाने भारतातील मुस्लिम समाजाच्या रोजगाराविषयी सुद्धा वर्णन केलेले दिसते.  

आखाती देशांमध्ये जेव्हा पेट्रोल तेल या इंधनाचा शोध लागला तेव्हा तेथे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपली कार्यालय स्थापन केली.  स्वाभाविकपणे त्यांना प्रामाणिक नोकरदार वर्गाची गरज भासू लागली, त्याचा परिणाम असा झाला की आखाती देशात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली.  मुंबई, रायगड, रत्नागिरीपर्यंत असलेल्या कोकण किनारपट्टी लगत राहणारा आणि विमानतळाच्या जवळील असलेला मुस्लिम समाज रोजगाराच्या निमित्ताने आखाती देशात जाऊ लागला. भारतामध्ये त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या पण इराक, इराण, दुबई या देशांमध्ये भारतीय प्रामाणिक मुस्लीम समाजाची नोकरदार म्हणून मागणी वाढू लागली प्रत्येक घरात एक पुरुष आखाती देशात नोकरीसाठी जाऊ लागला त्यामुळेच या समाजात विशेषत: या समाजातील नवशिक्षित वर्गाला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली. नसीम कुलकर्णी हा असाच सुशिक्षित तरुण होता असे कथेमध्ये चित्रित केलेले आहे

मुंबईतील प्रत्येक धार्मिक समाज आपापली जीवन व्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.  विशेषत: समर खडस मुस्लिम समाजाचे वर्णन करताना असे लिहितात की मुंबई येथील मस्जिदमध्ये मोफत नमाज अदा केला जात आहे, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. कारण मुंबईतील आर्थिक राजधानी असल्यामुळे इथला धर्म केवळ पैसा आहे.   सर्वधर्मगुरू मग ते मुस्लिम असो वा हिंदू ते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काम करताना दिसतात.  धर्मव्यवस्था  स्वतःच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक टिकवून ठेवली जाते. वेळप्रसंगी धर्मातील मूलभूत संस्कार, संस्कृती यांना बाजूला सारले जाते.  प्रत्येक जण एकमेकाचा वापर करताना दिसतो.  धर्म ही व्यवस्था  केवळ नावापुरतीच राहते.  ‘बकऱ्याची बॉडी’ या कथेतील नसीम कुलकर्णी या पात्राला न्याय देण्याऐवजी त्याचा वापर करून घेणे, धर्मामध्ये विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातो.  मुस्लिम समाज हा आक्रमक, दहशतवादी, मांसाहारी असे सर्वत्र जाणीवपूर्वक पसरवले जात असते.. लेखकाने या अपसमजाविरोधात वर्णन केलेले दिसते.. ज्याप्रमाणे हिंदू समाजात मांसाहार न करणारी माणसे असतात त्याचप्रमाणे मुस्लिम समाजात सुद्धा काही पंथ मांसाहार करीत नाहीत.  नसीम कुलकर्णी हा अशाच एका पंथातील आहे.  

नवशिक्षित मुस्लिम समाज आपल्या उपजीविकेसाठी आधुनिक कौशल्य समजून घेतो आणि गरज असल्यामुळे आखाती देशांमध्ये रोजगारासाठी जातो.  त्याचा दृष्टिकोन हा धर्मातीत म्हणजेच धर्माच्या पलीकडे असतो. समर खडस यांना सुशिक्षित मुस्लिम समाजाच्याकडे सर्वसामान्य माणसाची पाहण्याची भूमिका बदलवायची आहे असे दिसते.  नसीम कुलकर्णी हे पात्र जेव्हा आखाती देशात नोकरीसाठी जाते आणि काही कारणासाठी पुन्हा भारतात येते.. त्यावेळेस संशयाच्या भोवऱ्यात अडकून पोलिसांच्या मारझोडीत मृत्युमुखी पडते.  पोलीस कोठडीमध्ये दिली जाणारी थर्ड डिग्री शिक्षा आणि त्यामुळे झालेल्या नसीम कुलकर्णीचा करूण अंत लेखकाने चित्रित केलेला आहे. सर्व धर्माच्या स्वतःच्या काही असंसदीय छुप्या मारेकरी संघटना असतात, या संघटनांचे काम धर्म रक्षणाचे असते, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर संसदीय राजकारणासाठी केला जातो.  त्यामुळे अशा संघटनांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांना अभय दिले जाते, तर नसीम कुलकर्णी सारख्या निरपराध लोकांचा बळी दिला जातो.  सीमी या दहशतवादी मुस्लिम संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा आरोप नसीम कुलकर्णीवर  ठेवून त्याला अटक केली जाते. पोलीस कस्टडीमध्ये थर्ड डिग्री दिली जाते.  त्यात मृत्युमुखी पडलेल्या नसिम कुलकर्णीचा मृतदेह गायब केला जातो आणि तो फरार असल्याचे घोषित केले जाते.  त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारे जाधव आणि खान हे कॉन्स्टेबल हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माशी संबंधित आहेत..

‘असे हे विलक्षण जग’ या कथेतील लहानु हे पात्राच्या माध्यमातून निवेदक  ग्रामीण पार्श्वभूमीवरील महाविद्यालयीन शिक्षण यंत्रणावर भाष्य करीत एकूणच भारतीय शिक्षण परंपरेच्या व्यवस्थेचे परीक्षण करताना दिसतो. सरकारी महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांना देण्यात येणारा पगार हा एक लाखापेक्षा जास्त असल्यामुळे या पदाला मिळवण्यासाठी वशिला आणि भ्रष्टाचारातून पैसा पुरवल्या जातो. त्यामुळे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अशी माणसे प्राध्यापक पदावर विराजमान होतात.  त्यांना शिकवता येत नसते.  त्यामुळे ते विद्यार्थ्यांना वर्गापासून दूर ठेवतात.  त्याचा परिणाम एकूणच नव्या पिढीच्या शिक्षणाच्या दर्जावर होतो.  

‘असे हे विलक्षण जग’ या कथेचे लहानू हे पात्र एस्ट्रो फिजिक्स या विषयाचे अध्यापन करीत आहे.. परंतु या विषयाला विद्यार्थीच नाहीत त्यामुळे महाविद्यालयात हजेरी लावण्यापुरते काम लहानू करतो.  त्याचा या भरपूर पगाराच्या आणि भरपूर विश्रांतीच्या नोकरीमुळेच त्याच्यासारखेच काम करणाऱ्या त्याच्या वरिष्ठांच्या मुलीसोबत त्याचा विवाह झालेला आहे.   ग्रामीण पार्श्वभूमीवरील हे दुसरे जग लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  लेखक या विश्वाला दुसरे जग यासाठी संबोधतो की एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमाडणारे ग्रामीण माणसाची कृषी जीवन, गरिबी, भूकबळी या समस्या ज्या पार्श्वभूमीवर आढळतात, तिथेच सरकारी नोकरीशी संबंधित असलेले कामचुकार आणि व्यवस्था पोखरणारे विश्व सुद्धा दिसून येते.  शेतकऱ्याला याची सूत्राम कल्पना नसते.  त्यामुळे आपण यांच्यामुळे बळी जात आहोत याची जाणीव नसल्यामुळेच सरकारी महाविद्यालयांमध्ये काम करणारे प्राध्यापक शेतकऱ्यांच्या रोशाला बळी पडत नाहीत.  उलट प्राध्यापकांकडे शेतकरी सहानुभूतीने पाहत असतो.  असे आढळून आलेले आहे.  लहानूचे सासरे साहेबराव प्राध्यापक या पदाचा मिळणारा पगार व्यवसायामध्ये गुंतवतात.  खत कारखाना काढतात.  शेतीविषयक अवजारांचे व्यापार करतात.  स्वतःचे मोठे मोठे बंगले बांधतात.  बंगल्यांमध्ये लावण्यासाठी मलेशियातून झुंबर आणतात.  परंतु जे काम त्यांनी करायला हवे ते काम करीत नाहीत.  साहेबराव आणि लहानू  यांच्यामध्ये दारूच्या बारमध्ये बारबाला असलेले एका स्त्रीमुळे भांडण होते.. ती बारबाला लहानूला विनंती करते की साहेबरावला मारू नकोस, कारण त्यांच्यामुळेच माझी उपजीविका होते आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरील हे वास्तव लेखकाने सरकारला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 

नशीब ही कथा अतिवास्तवतावादी स्वरूपाची आहे.  या दृष्टीने आपला अतिवास्तवतावाद ही संकल्पना समजून घ्यावी लागते.  आपल्या सभोवती दिसणाऱ्या जाणवणाऱ्या - आपण ज्याची सहज कल्पना करू शकतो अशा विश्वाला वास्तव असे म्हणतात.  तर आपल्या सोबत कधी न घडणाऱ्या अतिशयोक्तीयुक्त कल्पनाशक्तीपेक्षा चमकृती म्हणजे फॅटसी  म्हणून जे विश्व आपल्याला जाणवते त्याला अतिवास्तवतावाद असे म्हणतात.  या गोष्टीचे आपण वास्तवामध्ये कल्पना सुद्धा करू शकणार नाही अशा स्वप्नातील घटनांसारख्या गोष्टी जेव्हा साहित्यामध्ये मांडल्या जातात.  तेव्हा त्याला अतिवास्तवतावाद असे म्हणतात.  नशीब या कथेमध्ये या गोष्टीचा काही प्रमाणात प्रत्यय येतो.  या कथेतील नायक गरीब होतकरू आणि कष्टाळू आहे, परंतु त्याला त्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळत नाही.  त्यामुळे तो हताश झालेला आहे.  पवई या मुंबईतील एका ठिकाणी त्याला एक व्यक्ती सोन्याची  कुराड आणून देतो आणि ही कुऱ्हाड त्याचे नशीब बदलणार आहे असे सांगतो, आणि खरोखरच ही कुऱ्हाड हातात आल्यापासून कथेच्या नायकाचे नशीब पालटू लागते.. भ्रष्ट मार्गाने त्याला पैसा मिळवून लागतो.  त्याच्या स्वप्नातही नसेल इतकी गडगंज संपत्ती त्याच्याजवळ येऊन लागते.  तसेच तो पूर्ण वेळ कार्यमग्न राहू लागतो.  सोन्याची कुऱ्हाड घेताना त्याला अज्ञात व्यक्तीने असे सांगितलेले असते की कुऱ्हाड घरी नेल्याने तुझे नशीब बदलून जाईल परंतु एका विशिष्ट वेळेनंतर ही कुऱ्हाड तुझ्या नशिबावर घाव घालेल.  या म्हणण्याप्रमाणे खरोखरच नायकाचे बदललेले नशीब पुन्हा पूर्वपदावर येऊ लागतील.  त्याचे वडील आणि त्याची पत्नी त्यांच्यात वाद होऊ लागतो.  त्यातून घरामध्ये तट पडतात.  कौटुंबिक कलाहामुळे त्याला मानसिक त्रास होऊ लागतो.  ज्यामध्ये पुन्हा पवईला जाऊन तो ती कुऱ्हाड दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा निर्णय त्याला घ्यावा लागतो. 

नशीब ही कथा कल्पनारम्य असली तरी लेखकांनी या कथेमध्ये काही महत्त्वाचे विषय चर्चेला घेतले आहेत.  त्यामुळे वाचकाला विचारसमृद्ध करण्याचा उद्देश दिसून येतो. मुंबई महानगरातील माणसाचा धकाधकीच्या जाणिवांचा परिचय करून देताना  मुंबईकर नैतिक-अनैतिक, पाप-पुण्य, बरे-वाईट या सर्व संकल्पना गुंडाळून ठेवतात.  त्यांना या संकल्पनांचा विचार करायला वेळ मिळत नाही.  परिणामी ते कार्यमग्न राहतात.  काही वेळा आपरिहारीपणे आणि स्वाभाविकपणे त्यांना अनैतिक संस्काराला सामोरे जावे लागते, त्यांच्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी सुद्धा त्यांना कराव्या लागतात.

‘पार्लेकरी सदाशिवपेठी  तत्व’ असा एका ठिकाणी लेखकांनी उल्लेख केलेला आहे.  अर्थात मुंबईतील विलेपार्ले हे उपनगर तर पुण्यातील सदाशिव पेठ शहर इथे राहणारी ब्राह्मण वर्गातील माणसे, ज्यांना आपण पांढरपेशी (व्हाईट कॉलर) असे म्हणतो, तीच माणसे मुंबई शहराला नैतिक अनैतिक या कल्पनांचा विचार करायला लावत असतात. प्रत्यक्षात मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे आर्थिक नैतिकता समजून घ्यावी असे लेखकाने सुचवले आहे. 

मुंबईचे वर्णन करताना भांडुप शहरातील गरीब लोकवस्ती तर पवई शहरातील उच्चभ्रू लोकांची मानसिकता यांच्यातील फरक मांडलेला आहे.  या दोन वेगवेगळ्या जीवनशैली असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी संघर्ष होतो.  या संघर्षाला शहरी नक्षलवाद असे लेखकाने संबोधले आहे.  शहरात राहून बुद्धिजीवी काम करताना काही माणसे सर्वसामान्य माणसाचं बुद्धिभेद करून शहराची एक मानसिकता बनवतात.  हा लपलेला अजेंडा किंवा ध्येय शहराचा कायदा आणि सुव्यवस्थेला धोकादायक जेव्हा ठरते तेव्हा अशा व्यक्तींना जरी त्यांनी काही मोठी गुन्हेगारी स्वरूपाची कृती केलेली नसली तरी, त्यांना शहरी नक्षलवादी म्हणून अटक केली जाते.  मुंबई महानगराचे हे स्वरूप विचार करण्याजोगे आहे.  जी माणसे शहराची सात्विक भूमिका तयार करू पाहतात त्यांना अटक केली जाते, तर जी माणसे भ्रष्टाचार, अनैतिक व्यवहार, काळाबाजार यांच्याशी संबंधित असतात परंतु शहराच्या अर्थचक्रासाठी आवश्यक असतात त्यांना पुरस्कार दिले जातात.  लेखक मुंबई महानगराचे याबाबत चिंतन करताना दिसतो.  कथेचा नायक जोपर्यंत सरळ मार्गाने कष्ट करतो तेव्हा त्याला त्याचे नशीब बदलत राहते.  परंतु जेव्हा तो भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतो तेव्हा तो श्रीमंत होतो.  भ्रष्टाचार हे महानगराच्या व्यवहाराचे तंत्रज्ञान आहे, तत्त्वज्ञान आहे असे या कथेत लेखकाने सूचित केलेले दिसते.  चीनमध्ये झालेली आर्थिक प्रगती आणि त्याचबरोबर सांस्कृतिक स्थित्यंतर (कल्चरल रेवोल्युशन ) याविषयी लेखकाने चर्चा केलेली दिसते.  देशातील आर्थिक स्थिती बदलायची असेल तर परंपरा मोडावी लागेल.  सांस्कृतिक बदल घडवावा लागेल.  तरच या देशाचे नशीब बदलू शकेल असे भाष्य या कथेतून प्रकट झाले आहे असे वाटते. 

    बेगम ही कथा मुस्लिम समाजातील स्त्री-पुरुष नाते संबंधाविषयी चर्चा करताना आढळते.  कथेतील बेगम ही खूप सुंदर तरुणी आहे.  लहानपणापासून तिला आपल्या सौंदर्यामुळे मिळणाऱ्या लोकांच्या आकर्षणाचा अनुभव आहे.  तिचे लग्न सुखवस्तू कुटुंबात होते.  परंतु तिच्या पतीचे निधन होते.  त्यानंतर तिच्याकडे सर्वजण वासनेच्या नजरेने पाहू लागतात. स्वतःच्या सौंदर्याचा तिला तितकारा वाटू लागतो, सौंदर्य नष्ट करण्यासाठी ती जाणीवपूर्वक स्वतःच्या शारीरिक बांध्याला बिघडवते.  परंतु तिच्या मनातील वासना  शमविता येत नाही.  त्यामुळेच पुरुष जातीचा मनामध्ये असलेला राग व्यक्त करण्याकरिता ती आपल्या घरात तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या मतिमंद मुलावर वासनेचा अत्याचार करते.. बेगम लहान असताना तिच्या नकळत तिच्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न तिच्या नात्यातील एका व्यक्तीने केलेला होता.  तोच राग तिने गेंगण्या या मुलावर व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.  या कथेमध्ये लेखकाने आक्रमक असलेल्या वासनेचा उद्रेक मांडलेला आहे.  स्त्री असो वा पुरुष एकदा वासना प्रबळ झाली की माणूस नैतिकता विसरून जातो.  आपली वासना शमवण्यासाठी तो कमजोर व्यक्तीला आपल्या वासनेचा बळी ठरवितो.  ही स्थिती सर्व धर्मांमध्ये, पंथांमध्ये आणि जगाच्या सर्व देशांमध्ये आहे. याला डोमेस्टिक व्हायोलन्स असे संबोधले जाते. घराघरांमध्ये आप्तसखीयांकडून, म्हणजेच नातेसंबंधातील व्यक्तीकडून जेव्हा शारीरिक अत्याचार होतो.  तेव्हा त्या विरोधात तक्रार करायला कोणी पुढे येत नाही.  त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हयाविरोधात बऱ्याचदा नोंदी सापडत नाहीत.  बेगम ही कथा डोमेस्टिक वायलेंसचे एक उदाहरण आहे. बेगम या पात्राचा नवरा जाणीबाबू हा आखाती देशात नोकरी निमित्त गेलेला आहे.  त्यामुळे त्याच्यापाशी भरपूर पैसा आहे.  परंतु त्याला कुटुंबसुख मिळत नाही.  स्वाभाविकपणे तो बेगमला शारीरिक दृष्ट्या सुखी ठेवू शकत नाही.  इराकमधील नोकरी ही भरपूर पैसा देणारी असली तरी तिच्यामुळे मुस्लिम समाजाला कौटुंबिक स्वास्थ्यापासून दूर लोटलेले आहे असे लेखकाने सूचित केलेले दिसते.


(उपरोक्त लेखन द्वितीय वर्ष कला शाखेच्या (शैक्षणिक वर्ष २०२२ ) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या उत्तराकरीता तयार केलेले आहे. )









भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...