Wednesday, April 27, 2022

नाद अंतरीचा - लेखक महावीर जोंधळे



            महावीर जोंधळे यांच्या नाद अंतरीचा या श्रीलंकेतील प्रवासवर्नानामध्ये प्रारंभ, भूतकाळ, वर्तमान, निसर्ग, संस्कृती, परंपरा, इतर काही  अशा उपकरणांची रचना असून यामध्ये एकूण २५ लेखांचा समावेश आहे. श्रीलंकेविषयी भारतीयांच्या मनामध्ये असलेली पुराणकथांबाबतची माहिती आणि प्रत्यक्षात श्रीलंकेचा इतिहास समजून घेत महावीर जोंधळे आपल्या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच श्रीलंकेकडे पाहण्याची अभ्यासात्मक, चिकित्सात्मक आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा शोध घेणारी निरीक्षणात्मक भूमिका स्पष्ट करतात.  

            प्रारंभ या  प्रकरणांमध्ये असलेल्या अंतरीचा नाद या मुक्तछंदात्मक दीर्घ कवितेत त्यांनी बोधिवृक्षाची, सिद्धार्थ गौतमाच्या बोधी प्रवासाची, अलौकिक जाणीवेची,  बुद्धाच्या पाऊलखुणांची मनातील अपेक्षा मांडलेली आहे. यातून श्रीलंकेच्या प्रवासाविषयीची त्यांची मानसिकता दिसून येते. तसेच या प्रवासाकडे ते धर्म, तत्वज्ञान,  समाजजीवन, संस्कृती, भविष्यातील श्रीलंकेतील जनजीवन याविषयी चिंतन मांडतात.  

                प्रवासाच्या सुरुवातीसच त्यांच्या मनात निर्माण झालेल्या निरनिराळ्या प्रश्नांना त्यांनी प्रश्‍नाचं मोहोळ अशी उपमा देऊन देऊन त्यांच्या वाचनात आलेल्या निरनिराळ्या तत्त्वांचा उहापोह केलेला आहे.  श्रीमती दुर्गा भागवत यांनी जातककथांविषयी मांडलेल्या विचारांचा, सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जीवनप्रवासाचा, श्रीलंकेत वास्तव्यास असलेल्या बोधी प्रवर्तकांचा लेखकाच्या मनामध्ये एक आलेख तयार होत जातो. याविषयी सत्यशोधन लेखकाला अपेक्षित आहे.  या प्रकरणांमध्ये लेखक असे लिहितो की "दुःखाचे मूळ शोधायचा तरी कशात? राजवाड्यातील कोनाड्यात, पंख उघडून बसलेल्या कबुतराच्या पंखात की आणखी कशात? गणितात?  कुठे शोधायचं?  गाभाऱ्यात की मंडपात? या प्रश्नाचे उत्तर मिळत राहतं जातक कथेत'

            भूतकाळ या प्रकरणांमध्ये अशोकवनातून, तांबपाणीचा चिमूटभर इतिहास, पुरोवालियाचा राजवाडा आणि मी,  श्रीलंका दंतकथा, दंतकथांचा प्रदेश अशा   लघुनिबंधातून लेखकाने श्रीलंकेच्या इतिहासाविषयी तसेच पुराण कथांतील श्रीलंकेच्या संदर्भाविषयी वर्णन केलेले आहे..  रावणइल्ला या परिसराच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करताना लेखक लिहितात सुंदर सुंदर डोंगर रांगातून फिरणं आणि निसर्ग चित्र बघत बघत पशुपक्ष्यांचे आवाज कानावर पडतात, तेव्हा हिरवे डोंगर बोलू लागतात, कान ध्वनीकांत होतात.. धबधब्याचं जाळ इतकं की डोंगर मनसोक्त न्हात असतात.. निसर्गानं दिलेलं बघण्यासाठी नाहीत पुरत काही तास, अख्खा दिवस देऊनही होत नाही समाधान..

             श्रीपाद यास्थळाविषयी माहिती देत असताना लेखकाने श्रीलंकेतील श्रद्धा, संस्कृती याविषयी काही मते मांडलेली आहेत श्रीपादपर्यंत पायी जाणार्‍याचा पुनर्जन्म पुरुष म्हणून होतो, हा समाज जरी रूढ असला तरी बऱ्याच महिला प्रसूतीच्या वेदना नको म्हणून श्रद्धेने श्रीपादपर्यंत जातात.   केवळ श्रद्धायुक्त भावनेने श्रीपाद लोकांना आकर्षून घेत नाही तर शिकार करण्यासाठीसुद्धा काही पर्यटक या स्थळी येतात.. लेखकाने या निबंधाच्या शेवटी असे लिहिलेले आहे की पशुपक्ष्यांना मारणाऱ्यांना अजून तिकडे देवपण प्राप्त झालेले नाही.  अर्थात रावणाच्या राज्यामध्ये पशुपक्ष्यांचा आदर राखला जातो असे लेखकाला सांगायचे आहे


            तांबपाणीचा चिमूटभर इतिहास या निबंधामध्ये सिंहांचे वंशज असा उल्लेख करून सिंहलींचा इतिहास समजून घेण्याविषयी  लेखक काही संशोधनात्मक विधाने करतो.. राजपुत्र विजय मूळचा हिंदुस्तानी पण तो सिंहवंशाचा नातू होता.. त्याने शोधलेल्या या बेटाचे नाव तांबपाणी अर्थात तांब्याच्या रंगाच्या वाळूचा प्रदेश असे संबोधले जात होते.. बौद्ध धर्मीय संप्रदायाचा प्रसार या प्रदेशात वाढला.. पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेत सुट्टी असते.. फुलाचे तबक हातात घेऊन बुद्धाच्या मूर्ती समोर लोक उभे असतात.. धार्मिक विश्वास आणि बौद्ध धर्म हे मोठ्या प्रमाणात सिंहलींना एकत्र बांधणारे धागे आहेत.. पोर्तुगीजांच्या आक्रमणानंतर सिंहलींमधील आडनावा मध्ये बदल घडून आला 


                सिंहली भाषेचा स्वीकार राष्ट्रभाषा म्हणून केल्यानंतर तामिळी आणि सिंहलीतील अंतर वाढत गेले.. राजकारणाचा एक भाग म्हणून भाषेच्या अस्मितेचा वापर केलेला श्रीलंकेत आढळतो.. श्रीलंकेतील हिंदू शैव पंथीय आहेत.. चंदनाच्या लाकडाची ऊटी आणि दैवी डोळा हे शिवाचं अस्तित्व पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यातच सगळं विश्व सामावलेलं आहे.. ही श्रीलंकेतील शैवसंप्रदाय यांची धारणा आहे. 

 

                श्रीलंकेत पट्टीणीची दंतकथा आहे.. धैर्यशाली, निश्चल, आदर्श पत्नी म्हणून पट्टीणीची आराधना करतात.. जंगलात राहणारे आदिवासी, कोळी, शेतकरी यांची ती देवता आहे.. भिक्खूंच्या वेश परिधान करण्याच्या पद्धतीवरून श्रीलंकेत छोटे छोटे गट ओळखता येतात.. एकच खांदा झाकून घेणारे सियाम भिकू म्हणून ओळखले जातात, भगव्या वस्त्राने झाकून घेणारे अमरपुरा संप्रदायातले तर ताडीच्या पानाचा सावलीसाठी म्हणून उपयोग करणारे रामन्या भिकू म्हटले जाते..



प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 
चैत्र कृ १३ , शके  १९४४ 
गुरुवार दिनांक २८ एप्रिल २०२२ 


Monday, April 25, 2022

कुंपणापलीकडचा देश २

चेहरा हरवलेला सुंदर शहर

        पाकिस्तानातील इस्लामाबाद या शहराची ओळख करून देताना कुंपणापलीकडचा देश या पुस्तकात लेखिका मनीषा टिकेकर चेहरा हरवलेला सुंदर शहर असा उल्लेख करतात.  आपल्या पाकिस्तानातील वास्तव्यामध्ये त्यांना इस्लामाबाद शहराविषयी जे अनुभव आले ते मांडताना या शहरात येण्यापासून ते शहरातून जाण्यापर्यंतचा एकूण प्रवासाचा आणि वास्तव्याचा अनुभव लेखिकेने मांडलेला आहे।   पाकिस्तानात जाण्यापूर्वी आपली खूप चौकशी केली जाईल आणि आपल्याला त्रास दिला जाईल असे लेखिकेला वाटले होते, परंतु 'पाकिस्तानात स्वागत असो' असं म्हणून पासपोर्टवर शिक्का मारून त्यांना लगेच मोकळं केलं केलं, याबद्दल लेखिका आश्चर्य व्यक्त करते.                                 

                भारतीय आणि पाकिस्तानी स्त्रियांमध्ये नेमका कोणता फरक आहे हेसुद्धा लेखिकेला या प्रवासात सहजगत्या समजले, एका प्रवासी स्त्रीने सहजपणे 'तू भारतीय आहेस का?' असे विचारले तिच्या विचारण्यामागे भूमिका अशी होती की भारतीय स्त्रियांमध्ये पाकिस्तानी स्त्रियांपेक्षा आत्मविश्वास जास्त असतो, हे निरीक्षण एका पाकिस्तानी स्त्रीचे आहे याची नोंद लेखिकेने केलेली दिसते 

            कर्नल अझीज उल हक स्वतः मनीषा टिकेकर यांना नेण्यासाठी आले, हा सुद्धा आदरातिथ्याचाच एक भाग होता, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे महत्त्वाचे असावे असे लेखिकेला वाटते.   इस्लामाबादमध्ये सर्व कार्यालय बारा वाजता शुक्रवारी जुम्याच्या नमाजासाठी बंद होतात. फैजल मज्जिद ही इस्लामाबादची एक सुप्रसिद्ध ओळख, आधुनिकता आणि सृष्टीसौंदर्याचा छान मिलाफ आहे, असे लेखिकेला वाटते।  या मशिदीचा विस्तार १८९७०५ चौरस मीटर इतका असून दहा मैलाच्या अंतरावरून दिसणारी मिनाराची उंची ८८ मीटर आहे. 

            इस्लामाबादमध्ये लेखिकेचे वास्तव्य रॉयल इंटरनॅशनल गेस्ट हाऊसमध्ये होते. या गेस्ट हाऊसचे मालक करीम मेघजी आगाखान पंथाचे होते ते राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले गुजराती भाषिक होते।  लेखिकेवर ती भारतातून आलेली असल्यामुळे आय एस आय ची करडी नजर असावी असा संशय लेखिकेला टॅक्सी ड्रायव्हरबाबत आला.  पाकिस्तानात निलगिरी वृक्षाची लागवड फार मोठ्या प्रमाणात आहे, महामार्गाच्या दुतर्फा निलगिरीच निलगिरी आढळते. इस्लामाबादचे  प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कडक उन्हाळ्यातही फुलणारी नानाविध फुल जास्वंद, सदाफुली, मधुमालती, बोगनवेलिया, चिनी गुलाब अशा रंगीबेरंगी फुलांनी फुटपाथ व्यापलेले असतात. फुटपाथवर हिरवळीचे पट्टे आणि फुलांचे ताटवे रहिवाशांनी मेहनतीने जोपासलेले दिसतात.  त्यामुळे इस्लामाबादमध्ये फूटपाथवरून चालणे खूप सुखावह असते असे लेखिकेने नोंदविलेले आहे.                             

            इस्लामाबादमध्ये  नैसर्गिक विविधता मुबलक प्रमाणात आढळते. डोंगरदऱ्या, पठार , जंगल सुपीक जमीन, आठ नद्या, धबधबे हे सर्वकाही लहानशा इस्लामाबादमध्ये सामावलेलं आहे. सोमन नदी ही सर्वात महत्त्वाची खुद्द शहरात आणि आसपास सिमली, खानपूर, तनाझा,  रावळ अशी कृत्रिम सरोवर आहेत आणि विभागाच्या भोवतालचा भाग  पहाडीने  वेढलेला आहे, अशी नोंद लेखिकेने केलेली आहे. इस्लामाबाद मध्ये परदेशी लोकांची खूप वर्दळ असते त्यामुळे त्यांच्यासाठी पुस्तकांची बरीच दुकाने इस्लामाबाद मध्ये आढळतात या शहरात पुस्तकांची खरेदी विक्री मोठ्या पद्धतीने होते. मिस्टर बुक्स या  ग्रंथालयात लेखिकेला गंगाधर गाडगीळ यांच्या कथासंग्रहाचं द वूमन अॅंड अदर स्टोरिज हया नावाचं इंग्रजी भाशांतर सापडलं. 

        रावळ सरोवर आणि त्या धरणावरील उदयान हे इस्लामाबादमधील एक पर्यटनस्थळ आहे. इस्लामाबाद आणि रावळपिंडी या शहरांना पाणीपुरवठयाचा हे सरावर हा एक मोठा स्त्रोत आहे येथे एक लहानसा बोटींग क्लब आहे.  लोक येथे फिशिगसाठी येतात.  रोझ अॅ ड जास्मिन गार्डनमध्ये २५०  जातीचे गुलाब आहेत तसेच दहा बारा तहेची जास्मिन आहेत.  जास्मिन हे पाकिस्तानचे राष्ट्रीय  फूल असून इस्लामाबादमध्ये जास्मिनची खूप रोपटी दिसून येतात.

        पाकिस्तानातील लाहोर आणि कराचीत राहणाऱ्यांना इस्लामाबाद आवडत नाही आणि इस्लामाबादकरांना लाहोर कराची आवडत नाही.  कारण इस्लामाबादमध्ये निसर्ग आणि आरामदायी जीवनात शांतपणा आणि एक प्रकारचा थंडपणा होता जो शहरातल्या लोकांना फारसा रुचत नाही अशी  टिपण्णी लेखिकेने केलेली आहे.  

        पाकिस्तानात भारतीय वर्तमानपत्रांपैकी मद्रासच्या हिंदू या वृत्तपत्राला अधिक मागणी आढळून येते. या वृत्तपत्रात पाकिस्तानविषयी बरेच छापून येते तसेच बीजेपी आणि संघ परिवाराबाबत हया दैनिकात बरीच टिप्पणी केली जाते. 

        पाकिस्तानमध्ये होणाऱ्या वेगवेगळया सेमिनारची सुरुवात किलावत म्हणजे कुराणातील काही आयाती म्हणून केली जाते.  एक महिन्याचे इस्लामाबादमधील वास्तव्य नमूद करताना लेखिकेची निरिक्षणशक्ती,  अनुभवसंपन्नता आणि अभ्यासूवृृत्ती दिसून येते.  आपण एका अशा देशात अभ्यासासाठी आलेलो आहोत जेथे आपल्या परस्पर भिन्न संस्कृती नांदत आहे.  जी आपल्यासाठी अपरिचित आहे याची जाणीव लेखिकेला आहे. परंतु या अपरिचित संस्कृतीतील काही परिचित संज्ञा तसेच चांगल्या कल्पनांची नोंद लेखिकेने केलेली दिसते. मानवी नातेसंबंध,  सांस्कृतिक संकल्पना,  देशाचे राजनैतिक संबंध , इतिहास, खादयसंस्कृती, सर्वसामान्य लोकांची मानसिकता ,  श्रीमंत लोकांची जगण्याची पध्दती यांचा अभ्यास लेखिकेने केलेला दिसतो.   


प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई 

चैत्र कृ ११ ,  वरुधिनी एकादशी

मंगळवार, २६ एप्रिल २०२२  


Friday, April 22, 2022

कुंपणापलीकडचा देश पाकिस्तान - लेखिका - मनीषा टिकेकर

 प्रस्तावना आणि ऋणनिर्देश


    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भावनिक दरी भारतीयांच्या मनामनात रुतलेली आणि रुजलेली आहे.  त्यामुळे पाकिस्तानबद्दल बोलताना प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये नकारात्मक पूर्वग्रह असतो.  तसा तो फाळणीपासून निर्माण झालेला असल्यामुळे या पूर्वग्रहाला विविध कारणांचे पाठबळ नंतरच्या काळात मिळत गेले.  त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युध्द असो,  बांगलादेशची फाळणी असो किंवा अगदी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे सामने असो;  भारतीयत्व हे पाकिस्तानविरोधी असतेच असा एक निकष सुध्दा तयार झालेला आहे.   मनीषा टिकेकर यांनी अभ्यासाच्या निमित्ताने पाकिस्तानला भेट देणे आणि पाकिस्तान या देशाचा राजनैतिक, आर्थिक, धार्मिक आणि सामाजिक अभ्यास करणे हे एक अप्रुपच आहे.  या प्रवासाच्या निमित्ताने, तसेच अभ्यासाच्या मांडणीतून त्यांनी प्रवासवर्णन साकार करणे ही साहित्याच्या संज्ञाप्रवाहात महत्वपूर्ण घटना मानावी लागते.  कारण त्यांच्या ‘कुंपणापलीकडचा देश’  या प्रवासवर्णनाला त्यांच्या अभ्यासक व्यक्तिमत्वामुळे विविध पैलू पडलेले आहे. 

मेजर जनरल, महमद अली दुराणी, डाॅ. शिरीन ताहिर खेली, डाॅ समीना यास्मिन, नुसरत जावेद या व्यक्तित्वांची ओळख करुन देत असताना लेखिकेची शैली ही या व्यक्तिमत्वांकडे पाकिस्तानी व्यक्ती म्हणून पाहण्याची नसून तिच्या एकूणच प्रवासात अभ्यासक व्यक्ती म्हणूनच या महत्वाच्या ठरणाऱ्या आहेत. प्रो. डाॅ. सतीश कुमार यांचा परिचय करुन देत असताना ते ट्रॅक टू डिप्लोमसीत सक्रीय असलेले आणि परराष्ट्रीय कामकाजामुळे भारत पाकिस्तानात येणे जाणे असल्याने त्यांची झालेली मदत त्यांनी मांडलेली आहे.  लेखिकेला प्रबंधाच्या अभ्यासानिमित्त भेटलेले प्रत्येक जण हे तज्ज्ञ आणि आपापल्या क्षेत्रातील महत्वपूर्ण काम करणारे असल्यामुळे या व्यक्तिमत्वांविषयी लेखिकेच्या मनातील सकारात्मकता दिसून येते.  प्रबंधाच्या निमित्ताने लेखिकेने पाकिस्तानातील ६० व्यक्तींच्या औपचारिक मुलाखती घेतलेल्या असून इतर अनेक अनौपचारिक गप्पा झाल्या याची नोंद लेखिकेने केलेली आहे.  पाकिस्तानमधील गेल्या ५४  वर्षात घडलेल्या घडामोडींचा इतिहास लेखिकेसाठी महत्वाचा होताच, परंतु या इतिहासाकडे येथील लोक कोणत्या भूमिकेतून पाहतात तेही महत्वाचे असल्याचे आढळून येते. 

पाकिस्तानची भावनिक स्थिती वर्णन करताना प्रस्तावनेमध्ये लेखिकेने राष्ट्रवादाची चिकित्सा केलेली आहे.  त्या लिहितात की राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम आवश्यक आहेच, परंतु विशिष्ट मर्यादेपर्यंत आणि तारतम्य राखून. लोक म्हणून लोकालोकांत शत्रुत्व नसतं. पण राष्ट्र म्हणून राष्ट्राराष्ट्रांतल शत्रुत्व भयानक स्वरुप धारण करतं.  त्यात आम्ही आणि ते अशा दोन संपूर्णपणे परस्परविरोधी एन्टीटीज निर्माण होतात. भारत असो वा पाकिस्तान देशाच्या विकासासाठी अनावश्यक अस्मिता हानीकारण ठरते.  नकारात्मक भावना प्रगतीसाठी मारक ठरते. लेखिका पाकिस्तानी व्यक्तींचे वर्णन करताना लिहितात की, सर्वसाधारण पाकिस्तानी माणूस आतिथ्यशील, आदबशीर, सहकार्य करणारा, मैत्रीला जागणारा, शब्द पाळणारा, बोलघेवडा आणि बुध्दीपेक्षा भावनेनं अधिक प्रेरित होणारा आहे.  लेखिकेची भूमिका अभ्यासक म्हणून असल्यामुळे त्यांना अनुभवायाला मिळालेल्या पाकिस्तानी व्यक्तिमत्वांचा त्यांनी केलेला अभ्यास तसेच त्यांच्यावर पडलेला प्रभाव त्यांच्या लेखनात आढळतो.  त्याच्यामते भारताने पाकिस्तानबद्दल आणि पाकिस्तानने भारताबद्दल राक्षसी प्रतिमा  निर्माण केलेली आहे,  जी पूर्णपणे चूकीची आहे.

        २००१च्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानातून परतत असताना संपूर्ण जगावर ११ सप्टेंबरच्या घटनेचे सावट पडले. त्यामुळे ओसामा बिन लादेन बाबत डेड और  अलाईव्ह  अशी भूमिका राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी घेतली.  त्यामुळे पुन्हा एकदा इस्लाम राष्ट्रांकडे पाहण्याची सर्व जगाची भूमिका बदलून गेली.  लेखिका या सर्व घटनांकडे अभ्यासात्मक भूमिकेतून पाहते. पाकिस्तानातील पाकिस्तान पार्लमेंटरी पीपल्स पार्टी (pppp)  आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (pml) या राजकीय पक्षां बाबतची सर्वसामान्य माणसाची मानसिकता तसेच पाकिस्तानातील लष्करी राजवटीकडे पाहण्याची सर्वसामान्य पाकिस्तानी माणसाची भुमिका लेखिकेने प्रस्तावनेमध्ये मांडली आहे.  आर्थिक दृष्ट्या सतत दिवाळखोरीकडे प्रवास करणारा पाकिस्तान धार्मिक विचारांमुळेच सतत अस्थिर आहे असे लेखिकेला वाटते.

        लेखिका मनीषा टिकेकर यांना एशियाज फेलॉज प्रोग्राम अंतर्गत फेलोशिप मिळाली सहा महिन्याच्या फेलोशिपसाठी २६ महिन्याचा अवधी मिळाला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये अभ्यासासाठी जाणे शक्य झाले. पाकिस्तानमध्ये पाऊल ठेवल्यापासून पाकिस्तान सोडेपर्यंत लाहोरच्या दयालसिंग कॉलेजमधले इंग्रजीचे माजी प्राध्यापक जफर अली खान यांच्या मदतकार्यामुळे पाकिस्तानमधले वास्तव्य सहज सोपे झाले असे लेखिकेने नोंदवले आहे. श्रीविद्या प्रकाशनाचे उपेंद्र कुळकर्णी यांनी पाकिस्तानातील अनुभव मराठीतून लिहिण्याचे आणि त्याचे पुस्तक रूपात प्रकाशित करण्याचे ठरविले. त्यांच्या इच्छा शक्तीमुळेच कुंपणापलीकडचा देश हे पुस्तक निर्माण झाले असे लेखिकेने ऋणनिर्देशात नोंदवले आहे.

प्रा आदित्य अंकुश संतोषी देसाई
चैत्र कृ.६ , शुक्रवार
२२ एप्रिल २०२२


भक्ती प्रदर्शनाचे ढोलताशे

ढोलताशे ( नाटक ) - चं प्र देशपांडे संस्कृती प्रवाही असते.  या प्रवाहात निरनिराळे घटक सामील होतात. काही काळ ते प्रवाहाचा भाग बनतात. आणि काला...